पंढरपूर – वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावरील मध्ययुगीन कालखंडापासूनचा इतिहास लाभलेल्या विठ्ठल रुक्मिणी पादुका विसावा मंदिराचा जिर्णोद्धार म्हणजे आमच्या संस्कृतीचे जतन करणेच आहे, यासाठी सर्वतोपरी सहकार्यास आम्ही कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सदस्य प्रशांतराव परिचारक यांनी केले. विसावा मंदिराच्या जिर्णोद्धार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी वारकरी संप्रदायातील संत मंडळी उपस्थित होती.
यावेळी राणा महाराज वासकर म्हणाले मंदिरासमोरील विहिरीचा जीर्णोद्धार होणे खूप गरजेचे आहे या विहिरीला एक ऐतिहासिक महत्त्व आहे येणाऱ्या महिना वारकरी तसेच वारी मध्ये येणाऱ्या वारकरी यांच्यासाठी या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध होतील उपलब्ध करून देण्यासाठी त्या पद्धतीने या व्यवस्था व्हावी आश्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विसावा मंदिराचे विश्वस्त व भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे यांनी उपस्थित आमचे स्वागत केले. यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक, शंकर महाराज बडवे, ह.भप.राणा महाराज वासकर, डॉ.प्रशांत सुरू, निवृत्ती महाराज नामदास, बापूसाहेब महाराज देहूकर, ऋषिकेश उत्पात, मुख्याधिकारी महेश रोकडे, अभयराव वांकरएकनाथ महाराज देशमुख ( जळगावकर ), रंगाप्पाजी, रघुनाथ महाराज कबीर, नागेश महाराज बागडे, समाजसेवक गणेशभाऊ अधटराव, सिकंदर ढवळे,विठ्ठल महाराज चवरे, आबासाहेब महाराज भोसेकर या मान्यवर व महाराज मंडळीच्या हस्ते नारळ वाढवून जीर्णोद्धार कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
शंकर महाराज बडवे व ऋषिकेश महाराज उत्पात यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशीर्वचन दिले. या मंदिराचा इतिहास व जिर्णोद्धाराची गरज आपल्या प्रास्ताविकातून पंढरपूर नगर परिषदेचे नगरसेवक व या मंदिराचे विश्वस्त सौरभ थिटे यांनी सांगितल्या. श्री विठ्ठल रुक्मिणी पादुका विसावा मंदिर इसबावी पंढरपूर हे वारकरी संप्रदायामध्ये एक महत्त्वाचे स्थान आहे. भगवंत परमात्मा पांडुरंग संतांना नेण्यासाठी याच ठिकाणी आले, त्यामुळेच भगवंताच्या चरणपादुका या मंदिरामध्ये आहेत. भगवंताची व संतांची भेट या ठिकाणी झाली, त्यांचा विसावा झाला, त्यामुळे याला विसावा मंदिर असेही म्हणतात.
आषाढी वारीमध्ये पूर्ण वारी काळात आषाढी दशमी दिवशी याच ठिकाणी सर्व संतांच्या पालख्या विविध मार्गावरून येऊन विसावा मंदिरापाशी संत भेटीसाठी एकत्र येतात.
कार्तिक पौर्णिमेला संत ज्ञानेश्वर महाराजांची व संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी विसावते. पंढरपूरातील नागरिक वारकरी विसावा मंदिरापर्यंत माऊलींना व तुकोबारायांना निरोप देण्यासाठी येतात.
कोल्हापूर महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जसा किरणोत्सव होतो, तसाच किरणोत्सव विसावा मंदिरामध्ये महाशिवरात्रीनंतर सात ते आठ दिवस होत असतो. असे या मंदिराचे असणारे महात्म्य याप्रसंगी अनेक संत मंडळींनी आपल्या भाषणातून सांगितले. याप्रसंगी ह.भ.प.राणा महाराज वासकर, ह.भ.प.बापूसाहेब महाराज देहूकर, ह.भ.प.निवृत्ती महाराज नामदास, डॉ.प्रशांत सुरू यांनीही मनोगते व्यक्त केली.
मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी पहिल्या टप्प्यातील रंग काढण्याचा पूर्ण खर्च श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान नीरानरसिंहपूरचे विश्वस्त व आळंदी देवस्थानचे पूर्व विश्वस्त डॉ.प्रशांत सुरू यांनी याप्रसंगी समर्पित केला. ते बोलताना म्हणाले या वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाचे ऐतिहासिक व पुरातन स्थान असलेल्या या विसावा मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी सेवा करण्याची संधी मिळते आहे ही खूप भाग्याचे गोष्ट आहे.
या मंदिराचा जिर्णोद्धार चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी व चांगले संवर्धन होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे
तसेच सुधा मोरे यांनी देखील उत्स्फूर्तपणे पंचवीस हजार रुपयांची देणगी याप्रसंगी समर्पित केली. मंदिर जिर्णोद्धारामध्ये मंदिर मूळ स्वरूपात आणणे, मंदिराच्या कळसाचे काम, तसेच मारुती मंदिराचा जिर्णोद्धार, जवळच असणाऱ्या विहिरीचा जिर्णोद्धार व तेथे येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा या सर्व गोष्टी करण्याचे प्रयोजन असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी या मंदिराचे विश्वस्त अभय शिटे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सचिन लादे यांनी केले. कार्यक्रमास वारकरी सांप्रदायातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, इसबावी ग्रामस्थ व वारकरी विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.























