तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
साष्टपिंपळगाव : तालुक्यात कुरण येथे काही वाळू चोर अवैधरित्या वाळूचा साठा करून वाहतूक करण्यात आहेत , याची कुणकुण महसूल व पोलीस प्रशासनाला लागली होती . जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजय बंसल , अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार , अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी , निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ , अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील , अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली . तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि गोंदीचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर हे गुप्त खाबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानुसार मागील दोन ते तीन दिवसापासून अशा प्रकारे कुठे साठा दिसतो का याची स्वतः जाऊन पाहणी करत होते , माहिती घेत होते . त्यांना असा तीन ठिकाणी अवैधरित्या वाळू साठा करण्यात आला असे निदर्शनास आले . त्यानंतर प्रमोद काटकर, मंडळ अधिकारी गोंदी मंडळ विभाग यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला .
23 जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, गोंदी यांचेसोबत प्रमोद काटकर, मंडळ अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक शेख, स्वप्नील खरात, तलाठी सजा पाथरवाला बु. यांनी पंचासमक्ष उक्त ठिकाणी जाऊन खात्री केली असता कुरण शिवारातील गोदावरी नदीपात्रात राजेंद्र कुरणकर यांचे मदतीने त्याचे शेताजवळ अंदाजे 2 ब्रास वाळु साठा केलेला आढळुन आला . आकाश पंडीत कुरणकर याचे मदतीने कुरण वाळकेश्वर रोडवरील त्याचे शेताजवळ 2 ब्रास अवैध वाळु साठा केलेला आढळुन आला . तसेच पाथरवाला शिवारातील बाबाची थडी शेतात जाणाऱ्या रस्त्याजवळ अवैध वाळु विक्री करण्याच्या उद्देशाने जमा केलेला अंदाजे 2 ब्रास वाळुचा साठा आढळुन आला . तो साठा गोदावरी नदीपात्रातुन वाळु वाहतुक करणारे अज्ञात लोकांनी आणुन टाकल्याचे समजले . वर नमुद ठिकाणावरील अवैध वाळूचा साठा हा पंचासमक्ष जप्त करुन हायवामध्ये भरुन पोलीस कॉलनी गोंदी येथे आणुन टाकला आहे . त्याचे वर्णन खालील प्रमाणे आहे . राजेंद्र कुरणकर याचे शेताजवळील , 2 ब्रास वाळुचा साठा प्रतिब्रास 4000 रु दराप्रमाणे 8000 रु. किंमतीची वाळू , आकाश कुरणकर याचे शेताजवळील 2 ब्रास वाळुचा साठा प्रति ब्रास 4000 रु. प्रमाणे आणि बाबाच्या थडीजवळ 8000 रु किमतीची वाळू असा एकूण 24000 रु. किमतीचा वाळू साठा आढळला . हा वाळूसाठा पुढील कारवाईसाठी पोलीस वसाहत गोंदी येथे जमा करण्यात आला आहे.
मागील तीन महिन्यापासून जालना जिल्हा प्रशासनाकडून अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक व उत्खनन करणाऱ्या विरोधात धडक मोहीम सुरू आहे . जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ , अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ , अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांचा सतत पाठपुरावा सुरु असतो .
मागील तीन महिन्यात अंबड तहसील अंतर्गत तेरा वाहने पकडण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 17 लाखाचा दंड वसूल करण्यात आला . तब्बल नऊ वाळू साठ्यांमधून 715 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे , असे नायब तहसीलदार धनश्री भालचीम यांनी सांगितले .
अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरूच राहतील , त्यामुळे कोणीही अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन अथवा वाहतूक करू नये , असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आवाहन केले आहे . तसेच त्यांनी ज्या गावातून वाळू , मुरूम वाहतूक होते अशा गावातील प्रतिष्ठित नागरिक , पदाधिकारी यांना आवाहन केले आहे की वाळू चोरणारे किंवा या व्यवसायात असणारे गावातील तरुण असतील तर त्यांना या कृत्यापासून परावृत्त करावे .
जिल्ह्यातील जनतेला जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी आवाहन केले आहे की अशा प्रकारे कोठेही अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक अथवा उत्खनन होत असेल तर तात्काळ संबंधित तहसीलदार , संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी यांना कळविण्यात यावे .
अपर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांनी जिल्ह्यातील जनतेस आवाहन केले आहे की घरकुलासाठी अथवा इतर शासकीय कामासाठी अधिकृत वाळू डेपो वरूनच वाळू घ्यावी . तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जे साठे जप्त करण्यात येतात तिथून घरकुलांसाठी प्राधान्याने वाळू उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी नमूद केले .