सोमवार – वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर येथे पदव्युत्तर विभागाच्या वतीने संशोधन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री दत्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी भूषविले. या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला जल अर्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. दत्ता गायकवाड म्हणाले, सोलापूरची भूमी अनेक संशोधकांची जन्मभूमी असून, सोलापूरला संशोधकांचा वारसा लाभला आहे. सोलापुरातील वातावरण संशोधनास पूरक असून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटीने संशोधन करावे ,तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात संशोधन करताना, ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर करावा,असे आवर्जून सांगितले. तसेच अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. कोटी सर यांनी विद्यार्थ्यांना आळस झटकून सदैव विविध विषयात संशोधन करावे व विद्यार्थ्यांनी संशोधनाची वृत्ती कायम अंगी बाळगावी, असे आवाहन केले.
या चर्चासत्रात एकूण अकरा विभागांनी सहभाग घेतला. तसेच एका विभागाकडून प्रत्येकी आठ याप्रमाणे 88 शोधनिबंध आज सादर करण्यात आले. यासाठी विविध तज्ञ परीक्षकांची नेमणूक करून प्रत्येक विभागातून एका उत्कृष्ट संशोधन पत्रिकेची निवड करण्यात आली. त्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मनोहर जोशी, उपप्राचार्य डॉ.शशिकांत हिप्परगी, पदव्युत्तर विभागाचे विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा.डॉ. अनिलकुमार कट्टी, कला विभागाचे समन्वयक प्रा. संतोष रेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. वरील कार्यक्रम पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, या कार्यक्रमासाठी पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल कट्टी यांनी केले, तर प्रा. होंगल मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना इंजाल, तर आभार प्रा. सविता शेरीकर यांनी मानले.























