सोलापूर – शहरात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तीन वेळा सन्मानपूर्वक मानपत्र प्रदान करण्यात आले. प्रत्येक भेटी प्रसंगी त्यांनी क्रांतीकारी संदेश दिला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या-ज्यावेळी सोलापूरला आले, त्या सर्व घटना सोलापूरकरांसाठी स्फूर्तीदायी ठरल्या. सोलापूर शहरात नगरपालिकेच्या वतीने 2 वेळा आणि तत्कालीन अस्पृश्य जनतेतर्फे एकदा असे तीन वेळा डॉ. बाबासाहेबांना थाटात मानपत्र अर्पण करण्यात आले.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सोलापूरशी अतूट ऋणानुबंध होता.सोलापूरकरांनी वेळोवेळी केलेला हा सन्मान केवळ एका महान व्यक्तिमत्त्वाचा गौरव नव्हे, तर त्यांच्या विचारांचा स्वीकार असल्याचेच यावरून स्पष्ट होते.
अस्पृश्य जनतेतर्फे गौरव सोहळा
सोलापूर येथील थोरला राजवाडा (सध्याचे मिलिंद नगर) 24 मे 1932 रोजी तत्कालीन अस्पृश्य जनतेच्या वतीने प्रथमच डॉ. बाबासाहेबांना मनोभावे मानपत्र प्रदान करण्यात आले. बेंच मॅजिस्ट्रेट पापय्या बाबाजी बेलपवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी म्युन्सिपल कौन्सिलर धर्माजी नरसु खरटमल, कौन्सिलर मोहनदास अन्याबा बाबरे, विश्राम जिना भंगी, पंढरी सखाराम बंदसोडे, सिद्राम बाबुराव जाधव, दत्तू तात्या सर्वगोड, नामदेव बुधाजी बंदसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अस्पृश्यांनी स्वत:च्या पायावर सर्वांगीण उन्नती करावी, असा स्फूर्तीदायी मंत्र त्यावेळी डॉ. आंबेडकर यांनी उपस्थितांना दिला.
लोकशाहीत अतिरिक्त श्रद्धाळू वृत्ती मारक
भागवत चित्रमंदिर येथे 1 जानेवारी 1938 रोजी नगरपालिकेच्या वतीने रावबहादुर डॉ. व्ही. व्ही. मुळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. संसदीय लोकशाहीत अतिरिक्त श्रद्धाळू वृत्ती मारक आहे. पक्षाचे विचार आणि कृती या विषयी लोकांनी कठोर चिकित्सा करून न्यायनिष्ठा केली पाहिजे, असा प्रेरक संदेश त्यांनी याप्रसंगी दिला होता.
सार्वजनिक कार्याची मुहूर्तमेढ सोलापुरात
येथील हरिभाई देवकरण हायस्कूलच्या कै. रा. ब. मुळे स्मारक मंदिरात दि. 14 जानेवारी 1946 रोजी जिल्हा लोकल बोर्ड व नगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना मानपत्र अर्पण करण्यात आले. तत्कालिन नगराध्यक्ष रावबहादुर नागप्पा अण्णा अब्दुलपूरकर यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच जिल्हा लोकल बोर्डाचे मानपत्र तत्कालिन बोर्डाध्यक्ष जी. डी. साठे यांनी प्रदान केले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मजूर मंत्री होते. सार्वजनिक कार्याची मुहूर्तमेढ मी सोलापुरात रोवली, असे डॉक्टर आंबेडकर यांनी त्यावेळी अभिमानाने सांगितले. मजूरमंत्री या नात्याने मजुरांच्या हिताकडे अधिक लक्ष देत आहे. मजूरांच्या हिताचे दहा कायदे करीत आहोत. ज्यामुळे देशाचे सामाजिक व आर्थिक दारिद्र्य दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.


















