बिलोली / नांदेड – ऑगस्ट महिन्यात झालेल्या ढगफुटीमुळे हसनाळ व रावणगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित-वित्तहानी झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून अजूनही काही कुटुंबे तात्पुरत्या आश्रयावर विसंबून आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर शासन, प्रशासन, व्यक्ती, सामाजिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्राने पुढाकार घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तत्परता दाखवली आहे. सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्थेनेही विविध घटकांच्या सहकार्याने मदतकार्य सुरू केले आहे.
पूरग्रस्तांच्या तातडीच्या गरजांचा विचार करून अधिक प्रभावी मदत कार्यक्रम आखण्यासाठी शुक्रवार (दि.५) रोजी सगरोळी येथे संस्कृति संवर्धन मंडळाच्या संकुलात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये घरकुल पुनर्बांधणी आणि कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली.
पूरामुळे अनेक घरे पूर्णपणे कोसळली असून काही घरे राहण्यायोग्य राहिली नाहीत. त्यामुळे ज्यांची घरे अद्याप उभी राहू शकलेली नाहीत अशा कुटुंबांना सर्वांच्या सहकार्याने घर उपलब्ध करून देण्यासाठी बैठकीत एकमत झाले. यासाठी अशा कुटुंबांची सर्वंकष माहिती तातडीने संकलित करून जलद मदत उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला.
जिल्हाधिकारी म्हणाले की, घरकुलांचे बांधकाम कमीत कमी खर्चात आणि शक्य त्या अल्पावधीत पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत आणि समन्वय दिला जाईल. मागणी केलेल्या कुटुंबांची अ, ब, क अशा गटांमध्ये प्राधान्यक्रमानुसार वर्गवारी करण्यात येणार असून एकल महिला आणि भूमिहीन कुटुंबांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही संपूर्ण मोहीम जिल्हा प्रशासन, संस्कृति संवर्धन मंडळ आणि मशाल संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. कामाची शास्रीय आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी एक समन्वय समिती गठित केली जाणार असून प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला ऑनलाइन बैठक आयोजित केली जाईल.
बैठकीच्या सुरुवातीला ‘मशाल’ संस्थेचे कार्यकारी संचालक निलेश करकरे यांनी हसनाळ व रावणगाव येथील क्षेत्र भेटीच्या आधारे पूरस्थितीचे विश्लेषण, नुकसानीचे स्वरूप आणि पुढील शक्यता यावर सविस्तर सादरीकरण केले. या बैठकीस संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख, जलतज्ञ डॉ. सुमंत पांडे, उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे, मशाल संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक गणेश शिंदे, संस्था कार्यकर्ते अभिजीत महाजन, वसंत रावणगांवकर, व्यंकट शिंदे तसेच हसनाळ व रावणगाव येथील राजू पाटील रावणगावकर, प्रदीप पाटील, शादुल पटेल, आनंदराव पाटील, शंकर पाटील, प्रल्हाद मादळे, पप्पू आप्पा हासनाळे, मशरू पटेल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ: पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सगरोळी (ता.बिलोली) येथे बैठक झाली.






















