पंढरपूर – राज्याची तिजोरी ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी असते. त्याच्यावर राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनतेचा अधिकारी असतो. त्यामुळे पैशावर अधिकार कुणीही सांगू नये. हे पैसे जनतेचे आहेत याची जाणिव प्रत्येकाने ठेवली पाहिजे असे खडे बोल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता राज्यातील भाजपाचे मंत्री,आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना सुनावले. कारण शिवसेना कार्यकर्त्यांकडून वारंवार निधी बाबत सत्तेतील मित्रपक्ष भाजपाकडून आपणावर दुजाभाव केला जात असल्याच्या तक्रारींचा पाढा वाचला जात होता. त्यावर भाष्य करताना शिंदे यांनी परखड शब्दात मित्रपक्ष भाजपाला ( नाव न घेता ) एक प्रकारे सज्जड इशाराच दिला.
येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके आणि भैरवनाथ शुगर्सचे अनिल सावंत यांनी शिवसेना ( एकनाथ शिंदे ) पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे दुप्पटे भालके, सावंत तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात घालून शिवसेनेत त्यांचा प्रवेश झाल्याचे जाहीर केले. यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या तिजोरीवर सर्वात पहिला अधिकार कुणाचा तो राज्यातील बळीराजाचा,लाडक्या बहिणीचा,लाडक्या भावांचा आहे. आम्ही जनतेचे मालक नाहीत तर सेवक आहोत. आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. पण आपल्यामुळे सर्वसामान्य जनतेला सोन्याचे दिवस कसे येतील या विचाराने आपण नेहमी काम करीत असतो.
आपण किती प्राँपर्टी कमाविली या पेक्षा आपल्याकडे सर्वसामान्य जनतेची किंवा लोकांची श्रीमंती किती आहे या गोष्टीला आपण महत्व देत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण मुख्यमंत्री असताना ऐवढा निधी दिलेला आहे की त्या दिलेल्या निधीतून अजून देखील काही ठिकाणी कामांचा शुभारंभ किंवा पुर्ण झालेल्या कामांची उदघाटने केली जात आहेत. आपण कधी या हाताचे या हाताला कळु दिले नसल्याचे आवर्जुन त्यांनी सांगितले.
शिंदेची शिवसेना ठाण्यापुरतीच मर्यादित राहणार असे विरोधकांकडून बोलले जायचे. त्यामुळे शिवसेना खरी कोणती हे वेगळे सांगण्याची आता गरज नसल्याचे यावेळी शिवेसना पक्ष प्रमुख शिंदे सांगितले. कारण प्रत्येक निवडणूकीत राज्यातील जनतेने दिलेल्या भरभरुन मतदाना मुळे शिवेसना चांद्यापासून ते बांद्यापर्यंत विस्तारलेली आहे. यापुढे देखील तिचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत राहिल. भगिरथ भालके, अनिल सावंत या सारखी तरुण मंडळी आता शिवसेनेत येत आहेत. त्यामुळे या मंडळींनी शिवसेना वाढीसाठी मनापासून प्रयत्न करावेत. आपण आज ही स्वत:ला शिवसेनेचा कार्यकर्ताच समजतो आहे. भालके, सावंत यांनी आता शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आपणा सर्वांच्या पाठिमागे विठ्ठल आहेच पण भालकें, सावंत यांच्या पाठीमागे या पुढील काळात एकनाथ देखील भक्कमपणे उभा आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
———————
काँरिडोरला शिंदेची देखील मान्यता
यावेळी भाषणात पंढरपूर काँरिडोर बद्दल बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँरिडोरचे काम हे सर्वांना विश्वासात घेऊनच केले जाईल असे नेहमीच्या पठडतील उत्तर दिले. मात्र राज्यभरातून, देशभरातून, आणि जगभरातून येथे लाखों भक्त येतात. त्यामुळे पंढरपूर हे तिर्थक्षेत्र आपणाला जागतिक दर्जाचे तिर्थक्षेत्र करावयाचे आहे. आता तर भगिरथ देखील आपल्या बरोबर आहेत त्यामुळे सर्वांनी मिळून या पंढरपूरचा कायापालट करावयाचे असल्याचे सांगत एक प्रकारे उपमुख्यमंत्री शिंदे यांची देखील पंढरपूर काँरिडोरला मान्यता असल्याचे त्यांच्या बोलण्याच्या रोखातून दिसुन आले.
——————–
शंभर कोटींची निधीची घोषणा काही झालीच नाही
भगिरथ भालके यांनी पक्ष प्रवेशा संदर्भात माहिती घेताना घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी ज्या दिवशी पक्ष प्रवेश होईल त्याच दिवशी नेत्याकडून पंढरपूरच्या विकासकामांसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करुन घेऊ असे सांगितले होते. मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केवळ पंढरपूर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी निधी आणि मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर आणि चोखामेळा स्मारकासाठी निधी बद्दलच मोगम उहापोह केला. त्यामुळे शंभर कोटी निधी आणू म्हणणारे भालके आता यापुढील काळात किती निधी आणतात हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
——————-
आँपरेशन बिपरेशनच्या फंदात आपण पडत नाही
येथे काही पत्रकारांनी आपणाला विचारले की, आँपरेशन टायगरची सुरुवात झाली आहे का ? आपण एकदाच आँपरेशन केलेले होते. ते अजून देखील सर्वांच्या लक्षात आहे. आज पर्यंत आपल्या शिवसेनेत कित्येक जण सहभागी झालेले आहेत. त्यामुळे जर ओषध, गोळ्याने उपचार होत असेल तर आँपरेशन बिपरेशनच्या फंदात आपण पडत नसल्याचे देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
————-
भालकेंनी केल्या या मागण्यां
यावेळी नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके यांनी पंढरपूर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी, यमाई तलाव विकासासाठी, शहरातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली. तर भगिरथ भालके यांनी आषाढी यात्रेच्या कामांसाठीचा निधी अगोदरच मिळावा, मंगळवेढा येथे २४ गावांच्या उपसासिंचन योजनेसाठी, चोखामेळा,महात्मा बसवेश्वर आदी कामांसाठी निधीची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी केली.
——————
यांची होती उपस्थिती
या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यास आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री भरत गोगावले, खासदार ज्योती वाघमारे, माजी मंत्री तानाजी सावंत, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, जिल्हा प्रमुख महेश साठे आदी प्रमुख मंडळींसह शिवसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.























