पुणे – नाशिकमधील कथित ज्योतिषी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडक केलेल्या कारवाईचे भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी स्वागत केले आहे. ‘कॅप्टन’ प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.मात्र, घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीकडूनच महिला विरोधी प्रवृत्तीला अप्रत्यक्ष राजाश्रय मिळत असेल, तर ही बाब चिंताजनक आहे; अशी खंत पाटील यांनी बोलून दाखवली.
देवाभाऊंनी याप्रकरणात स्वत: लक्ष घालत तपासाला दिलेला वेग लक्षात घेता त्यांची पीडितांना तात्काळ न्याय देण्याची कळवळ लक्षात घेण्यासारखी आहे, असे पाटील म्हणाले. ढोंगी अशोक खरात याच्यावर महिलेच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्यानंतर प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. त्यानंतर या प्रकरणात विविध धक्कादायक बाबी समोर येत असून चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि पाद्यपूजेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक नेत्यांचे फोटो देखील खरात यासोबत दिसत आहेत. राजकीय वर्तुळात त्यामुळे बरीच चर्चा रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर पाटील यांनी ही कारवाई योग्य दिशेने उचललेले पाऊल असल्याचे म्हटले आहे. ‘कॅप्टन’सारख्या व्यक्तीला मिळणारा अप्रत्यक्ष राजाश्रय अत्यंत चिंताजनक असून यामुळे शासन व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो, असे पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, केवळ राजीनामा घेऊन प्रकरण थांबवू नये, तर या प्रकरणातील पीडित महिलांना जलद आणि प्रभावी न्याय मिळाला पाहिजे. निष्पक्ष चौकशी करून खरात ला मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.






















