लंडन , 20 जून (हिं.स.)।इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामन्याला काहीशी भावनिक सुरूवात झाली.या सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघातील खेळांडूंनी १२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी आणि अपघातात प्राण गमावलेल्या नागरीकांना श्रद्धांजली देण्यासाठी दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले.
१२ जून रोजी अहमदाबादमधील मेघाणी नगर परिसरात एअर इंडिया फ्लाइट AI171 (बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर) या प्रवासी विमानाचा अपघात झाला. हे विमान अहमदाबादमधून लंडनला जात होते.या विमानात २४२ प्रवासी होते. यातील केवळ एक प्रवासी या अपघातातून बचावला आहे. बाकी २४१ प्रवाशांनी या अपघातात प्राण गमावले. दरम्यान, या अपघाताबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी आणि अपघातात प्राण गमावलेल्या नागरीकांना श्रद्धांजली म्हणून भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडूंनी दंडाला काळी पट्टी बांधली आहे. याशिवाय सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी १ मिनिट मौन बाळगत दोन्ही संघांनी श्रद्धांजलीही वाहिली.
दरम्यान, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी सलामीला खेळताना डावाची सुरुवात केली.या दोघांनीही पहिल्या १४ षटकात एकही विकेट गमावली नाही. हेडिंग्लेला झालेल्या गेल्या ७ कसोटी सामन्यात पहिल्यांदाच असं झालंय की सामन्याच्या पहिल्या १० षटकात एकही विकेट गेलेली नाही. या सामन्यातून भारताकडून साई सुदर्शनचे पदार्पण झाले आहे, तर करूण नायरने ८ वर्षांनी पुनरागमन केले आहे.