मुंबई – अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय हा माझ्या जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय आहे.असे भावपूर्ण प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी केले. वर्षा निवासस्थानी आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय सेवेत रुजू झालेल्या अनाथ मुलांशी संवाद साधताना त्यांनी भावना व्यक्त केल्या.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज मलाही मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन वर्ष झाले. या वर्षपूर्तीची सुरुवातप्रसंगी अतिशय सुंदर कार्यक्रमाने झाली. निःशब्द भाव खूप बोलणारा असतो, तसा भाव आज माझ्या मनात आहे. शासनात अनेक निर्णय घेतले जातात, अनेक कामे केली जातात, पण काही निर्णय मनाला गहिवर देतात. तसाच अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय आहे.
संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘संधीची समानता’ हे तत्व आपल्या संविधानात समाविष्ट केले. पण ही समानता केवळ सामाजिक आरक्षणातून मर्यादित राहता कामा नये. अनाथ, दिव्यांग आणि इतर वंचित घटकांनाही संधी मिळायला हवी. त्या विचारातूनच 1 टक्के अनाथ आरक्षणाचा निर्णय झाला. या निर्णयामुळे अनेकांच्या आयुष्यात खरा बदल घडला आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
ते म्हणाले,’ आपण जे काही साध्य करतो, ते समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे शक्य होते. शाळा, संस्था, शासनव्यवस्था, उद्योग हे सर्व समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. त्यामुळे या समाजाला परत काहीतरी देणे, हा प्रत्येकाचा धर्म आहे. संघर्षातून पुढे आलेले हे युवक समाजात ‘रोल मॉडेल’ बनावेत, अशी अपेक्षा व्यक्त करून फडणवीस यांनी जिथे पोहोचलात तिथे थांबू नका. संघर्षातून मिळवलेले यश हे पुढे समाजासाठी अविरत कार्य करण्याची प्रेरणा ठरावी. स्थैर्य मिळाल्यानंतरही समाजासाठी काहीतरी देण्याची भावना मनात कायम ठेवावी,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विनायक विश्वकर्मा या युवकाने मुख्यमंत्री यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत ‘आज घ्यायला नाही सर, काही द्यायला आलोय,
तुम्ही आरक्षण दिलं, दारिद्र्यातून बाहेर आलोय
तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, पण आम्ही तुम्हाला ‘देवा भाऊच’ म्हणणार’ अशी भावस्पर्शी कविता सादर केली.त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याचे कौतुक करीत, या कवितेतून उमटणारी कृतज्ञता हीच या निर्णयाची खरी पावती असल्याचे सांगितले.
























