अक्कलकोट – महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ तसेच विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील झिरो माईल परिसरात १० डिसेंबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील तब्बल २० ते २५ हजार पोलीस पाटलांनी हजेरी लावून आपली मागणी ऐकवली. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, ठाणे, नाशिक, नांदेडपासून ते गडचिरोलीपर्यंतच्या ३६ जिल्ह्यांतील पोलीस पाटलांनी सहभाग नोंदवला.
संस्थापक भिकाजी चाबुराव पाटील (कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्याध्यक्ष बाळासाहेब बाजीराव शिंदे पाटील तसेच कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण साळुंके पा., खजिनदार निळकंठ थोरात पा. सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवानंद फुलारी पाटील, कार्याध्यक्ष सैपन बेगडे, आदी पदाधिकारींची विशेष उपस्थिती होती.
मोर्चादरम्यान वयोमर्यादा ६० वरून ६५ करणे, सेवानिवृत्तीनंतर ठोस आर्थिक लाभ, नूतनीकरण प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करणे, पोलीस पाटील अॅक्ट १९६७ मध्ये दुरुस्ती, महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत पोलीस पाटील कायम ठेवणे, आकस्मित मृत्यू झाल्यास सानुग्रह निधी, रिक्त पदे तातडीने भरणे, दुसऱ्या गावाचा चार्ज सांभाळणाऱ्यांना ५०% मानधनवाढ, तसेच पोलिस व महसूल खात्यात मुलांना ५% आरक्षण अशा प्रमुख मागण्यांवर आवाज उठवण्यात आला. मोर्चा स्थळी अनेक आमदार व लोकप्रतिनिधींनी भेट देऊन मागण्यांना पाठिंबा दर्शवला. शेवटी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय लवकरच जाहीर करू, अशी ग्वाही दिली.
चौकट :-
१) सोलापूर जिल्ह्यातून: सुमारे २०० पोलीस पाटील उपस्थित होती. सहभागी जिल्हे: मुंबईसह ३६ जिल्हे एकूण गर्दी: २० ते २५ हजार पोलीस पाटील नागपूर – झिरो माईल येथे दिवसभरात तळ ठोकून होते.
२) मागील अनेक वर्षांपासून पोलीस पाटलांच्या हक्कांच्या मागण्या प्रलंबित आहेत. आजच्या मोर्चाला हजारोंची उपस्थिती होती; एक किलोमीटर लांब रांग लागली होती. सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच मागण्या मान्य होतील.” अन्यथा पुन्हा मोर्चा करू.
– बाळासाहेब शिंदे पाटील, राज्याध्यक्ष, गाव कामगार पोलीस पाटील संघ, मुंबई

















