पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या भोवती असलेल्या कायमस्वरुपी दुकानदारांपेक्षा तात्पुरत्या स्वरुपात व्यवसाय करणाऱ्या व्यापारी, फेरीवाले, हातगाडीवाले यांची अतिक्रमणे मंदिर परिसरात वाढलेली दिसत आहेत. मात्र त्याकडे पालिका,महसूल तसेच पोलिस प्रशासनाचे पुर्ण दुर्लक्ष होत आहे. वाढलेल्या अतिक्रमणामुळे सहाजिकच मंदिर परिसरातील सध्या अस्तित्वात असलेले आहे ते प्रशस्त रस्ते अरुंद किंवा छोटे पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरत्या अतिक्रमणांवर कारवाई करावी अशी मागणी वारकरी भाविक तसेच शहरातील सुज्ञ नागरिकांतून होत आहे.
राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचे विठ्ठल मंदिर प्रसिध्द आहे. दरवर्षी येथे चार प्रमुख यात्रा भरत असतात. या यात्रांच्या काळात लाखोंच्या संख्येने भाविकांची येथे मांदियाळी असते. ऐरव्ही देखील दररोज पन्नास ते साठ हजार भाविकांचा येथे राबता असतो. सलग सुट्यां लागून आल्या तर या मध्ये मोठी वाढ होत असते. त्यामुळे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर नेहमी गजबजुन गेलेला असतो. भाविकांची गर्दी वाढली तर मंदिर परिसरातून सर्वसामान्यांना चालणे देखील जिकरीचे होते.
मंदिर परिसरातील रस्ते तसे बऱ्या पैकी प्रशस्त आहेत. मात्र पूर्वी मंदिर परिसरातील कायमस्वरुपी स्थानिक दुकानदार मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करीत होते. मात्र गेल्या दोन,तीन वर्षापासून काँरिडोरच्या भितीने स्थानिक नागरिकांची अतिक्रमणे कमी झालेली दिसत आहेत. मात्र तात्पुरत्या स्वरुपात व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकांची, फेरीवाले, हातगाडीवाले यांच्या अतिक्रमणात कमालीची वाढ झालेली दिसत आहेत. त्यामुळे मंदिर परिसरातील प्रशस्त असलेले रस्ते अरुंद भासत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपातील अतिक्रमणाला पायबंद करावा अशी मागणी वारकरी भाविक तसेच शहरातील सुज्ञ नागरिकांतून केली जात आहे.
————————
चैत्री वारी तसेच अधिक मासात गर्दी वाढणार
येत्या काही दिवसांवर चैत्र वारी आलेली आहे. त्या नंतर पुन्हा अधिक मास आहे. त्यामुळे इथुन पुढच्या काळात पंढरपूरातील गर्दी मध्ये सातत्याने वाढ होत राहणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील रस्ते भाविकांना चालण्यासाठी अपुरे पडणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने आत्ता पासूनच मंदिर परिसरातील कायमस्वरुपी दुकानदारांना तंबी देवून त्यांना एका ठराविक रेषेच्या बाहेर आपली दुकाने आणण्यापासून मज्जाव करावा. या बरोबरच मंदिर परिसरात तात्पुरते व्यवसाय करणारे जे विक्रेते आहेत त्यांचा देखील बंदोबस्त करावा, या शिवाय हातगाडी, फेरीवाले यांना देखील दुसरीकडे मोकळ्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी जागा द्यावी तरच मंदिर परिसर सुटसुटीत दिसेल.
——————–
मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर
विठ्ठल मंदिर हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्यामुळे मंदिराच्या सुरक्षेसाठी राज्याच्या गृहविभागाने कायमस्वरुपी खास पोलिस बंदोबस्त देवू केलेला आहे. मंदिरा बाहेर स्वतंत्र पोलिस चौकी देखील कार्यरत आहे. मात्र मंदिर परिसरातील फेरीवाले, हातगाडीवाले तात्पुरत्या स्वरुपातील व्यवसाय करणारे विक्रेते यांच्याकडे मंदिर परिसरात विक्री करण्यासाठी कोणताही परवाना नाही. त्यांची शासकीय दप्तरी कुठेही नोंद नाही. त्यामुळे येथील विठ्ठल मंदिराची सुरक्षा सध्यातरी रामभरोसेच दिसत आहे.
——————-
काँरिडोर प्रकल्प रेंगाळला
मंदिर परिसर प्रशस्त आणि मोकळा असावा यासाठी विठ्ठल मंदिर परिसरात शासनाकडून काँरिडोर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मात्र गेल्या दोन,तीन वर्षापासून या प्रकल्पाची नुसतीच चर्चा होत आहे. त्यासाठी कोणतीही ठोस कृती होताना दिसत नाही. सध्या जशी मंदिर परिसरात तात्पुरत्या व्यवसायीकांची भाऊगर्दी आहे तशीच गर्दी काँरिडोर झाल्या नंतर देखील सुरुच राहिली तर काँरिडोर करुन तरी काय उपयोग होणार, मंदिर परिसर पुन्हा आरुंद, चालण्यासाठी अपुराच पडणार असा देखील सूर मंदिर परिसरातील संभाव्य बाधित नागरिकांकडून आळविला जात आहे.
























