
सोलापूर – मराठी भाषेचा सातत्याने अवमान करणाऱ्या सरकारचा तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडताना केलेल्या मराठी उच्चारांच्या चुकीच्या वापराचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूरच्या वतीने बुधवार दि. २४ जून रोजी अनोखे आंदोलन करण्यात आले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल नार्वेकर यांच्या पत्त्यावर मराठी बाराखडी, मराठी व्याकरणाची पुस्तके आणि काही नामवंत मराठी साहित्यिकांची पुस्तके पाठवून निषेध नोंदविला.
यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राची ओळख, स्वाभिमान आणि अस्मिता असल्याचे सांगितले. मराठी भाषेचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
“मराठी भाषा ही केवळ पुस्तकांपुरती मर्यादित नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. कोणत्याही पदावर बसलेल्या व्यक्तीपेक्षा मराठी भाषा आणि मराठी संस्कृती आमच्यासाठी मोठी आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी पाठविलेली बाराखडी आणि व्याकरणाची पुस्तके अभ्यासून मराठी भाषेचे ज्ञान आत्मसात करावे,” अशी भूमिका मनसेच्या वतीने मांडण्यात आली.
तसेच, मराठी भाषेबाबत निष्काळजीपणा सुरूच राहिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी मनसे कायम आक्रमक भूमिका घेईल, असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहरअध्यक्ष जैनोद्दीन शेख, अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, जितेंद्र टेंभुर्णीकर, सुभाष माने, प्रकाश कोळी, विश्वास गजभार, अभिषेक इरकल,समर्थ माळगे,गोरक्ष उपरे,मयूर सोलनकर, विकास उपरे आदी उपस्थित होते.























