बुलढाण्यातील बस दुर्घटना ताजी असताना आज पुन्हा समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यातील बस दुर्घटना ताजी असताना आज पुन्हा समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर आज पुन्हा अपघात होऊन तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कारचा भीषण अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघातात तिघांचा मृत्यू
भरधाव वेगाने येणारी कार गाडी डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाल्याचं समोर येत आहे. या अपघातात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. नांदेडहून मुंबईकडे निघालेल्या गाडीला अपघात झाला आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बुलढाणा बस अपघाताची घटना ताजी असताना आज पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात घडल्याने रस्ते अपघात आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बुलढाणा दुर्घटना ताजी असताना पुन्हा अपघात
बुलढाण्याजवळ शनिवारी मध्यरात्री झालेला अपघात हा समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात आहे. या बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बसमधील 32 प्रवाशांपैकी 8 जण सुदैवाने बचावले. मध्यरात्री दीड वाजता समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा गावाजवळ बसचा अपघात झाला. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आलं नाही. काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर आले.
समृद्धी महामार्गावरच कोपरगावात शुक्रवारीही तिघांचा मृत्यू
दरम्यान, शुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर कोपरगावात भीषण अपघात झाला होता. अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यातील अपघातात तीन जण ठार तर 5 जखमी झाले. क्रूझर जीप आणि आयशरच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. पती-पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलीचा मृतांमध्ये समावेश आहे. संतोष राठोड (वय 35) , वर्षा राठोड (वय 29) आणि अवनी राठोड (वय दीड वर्ष) अशी मयतांची नावे आहेत. हे जालना जिल्ह्यातील मंठा गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे.