सोलापूर – समाज कल्याण, पुणे विभाग व श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२/०४/२०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व जनजागृती अभियानांतर्गत महिला मेळावा व व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुलोचना सोनवणे, सहाय्यक आयुक्त, सोलापूर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. गजानन धरणे उपस्थित होते. तसेच ॲड. द्वारका देवळे, सामाजिक कार्यकर्ते व कायदेविषयक सल्लागार, आयुष व्यसनमुक्ती केंद्र, जामगाव, डॉ. मृणालिनी मोरे, सौ. शारदाताई हजारे, महिला जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, लातूर, सौ. वंदनाताई कांबळे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्रीशैल मळेवाडी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून केली. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांची ओळख प्रा. शुभांगी माशाळकर यांनी करून दिली. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. मान्यवरांचा शुभहस्ते दिपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली
आपल्या प्रास्ताविकामध्ये सुलोचना सोनवणे यांनी दि. ८ ते १४ एप्रिल हा सामाजिक समता सप्ताह म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगितले. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असल्याचे नमूद करत त्यांनी भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन मूलभूत मूल्ये समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच विविध शासकीय योजना, शिक्षण योजना, सामाजिक जनजागृती कार्यक्रम, व्यसनमुक्ती अभियान, तसेच महाड चवदार तळे सत्याग्रहावर निबंध स्पर्धा, स्वच्छता मोहिम आणि पत्रकार परिषद यांसारख्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. “एक स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते” हा महत्त्वपूर्ण संदेशही त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिला. त्यानंतर सुलोचना सोनवणे यांनी उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. यामध्ये . प्राचार्य. गजानन धरणे, प्रा. प्रमोद शिवगुंडे, प्रा. नवनाथ माने, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. स्वाती मनियाल, डॉ. श्रीशैल मळेवाडी, रेणुका इरशेट्टी व पौर्णिमा शिवपूजे यांचा समावेश होता.
शारदाताई हजारे यांनी विद्यार्थिनींना मानवतेच्या दृष्टीने विचार करणे, योग्य निर्णय घेणे आणि राज्यघटनेचे वाचन करून स्वतःचे अधिकार जाणून घेणे याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन व मुलींनी स्वतःच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचा संदेश दिला.
अॅड. द्वारका देवळे यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध असलेल्या विविध कायद्यांची माहिती दिली. विशेषतः १९६१ चा हुंडा प्रतिबंधक कायदा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी सुरू केलेल्या पहिल्या शाळेचा उल्लेख करून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. मृणालिनी मोरे यांनी नशामुक्त भारत प्रकल्प आणि व्यसनमुक्ती अभियानाविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी २१व्या शतकातील तणाव, नैराश्य, गेमिंग आणि गॅम्बलिंग यांसारख्या समस्यांवर भाष्य केले. विद्यार्थिनींनी क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग आणि सहानुभूती यांसारखी जीवनकौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य गजानन धरणे यांनी सर्वांना मतदानाचा समान अधिकार, दलितांना न्याय आणि चवदार तळ आंदोलनाचे ऐतिहासिक महत्त्व यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास प्राध्यापकवर्ग तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. श्रीशैल मळेवाडी यांनी केले.


















