वेळापुर – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे उद्या, १४ मे २०२६ (गुरुवार) रोजी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे निरीक्षण आणि भूमिपूजन करणार आहेत.
मंत्री गडकरी हे सकाळी ८:३० वाजता पुण्यातील हॉटेल जे.डब्ल्यू. मॅरियट येथून हडपसरकडे रवाना होतील. त्यानंतर दिवे घाट मार्गे जेजुरी आणि पुढे फलटणला भेट देतील. सकाळी ११:०० वाजता ते ‘नीरा कॅनल ब्रिज’ची पाहणी करून दुपारी १२:०० वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील.
फलटणहून नातेपुते आणि वेळापूर मार्गे ते दुपारी २:०० वाजता पंढरपूरला पोहोचतील. दरम्यान खुडूस ता माळशिरस येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या पुरातन बारव (विहीर) याठिकाणी ते पाहणी करणार आहेत तसेच बाजीराव विहीर पंढरपूर येथेही पाहणी करून पुढे ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतील. त्यानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी दुपारचे भोजन व विश्रांती होईल.
दुपारी ४:४० वाजता ते हेलिकॉप्टरने पंढरपूरहून अक्कलकोटसाठी रवाना होतील. अक्कलकोट येथे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आणि शिवपुरीला भेट दिल्यानंतर, संध्याकाळी ६:३० वाजता सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहतील.
मंत्री गडकरी यांना ‘Z+’ श्रेणीची सुरक्षा असून या दौऱ्यात CRPF चे पथक त्यांच्या सोबत असेल. या दौऱ्यात पुण्यापासून फलटणपर्यंत साधारण ७० माध्यम प्रतिनिधी दोन बसमधून सोबत असणार आहेत. मंत्री गडकरी यांचा रात्रीचा मुक्काम सोलापूर येथील हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर येथे असेल.
• घुलेनगर, खुडूस, ता माळशिरस येथील ऐतिहासिक विहिरीची माहिती
खुडूस (जि. सोलापूर) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील ही ऐतिहासिक विहीर असून ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या अनेक लोकोपयोगी कामांपैकी एक मानली जाते. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्या कारकिर्दीत पांथस्थांची आणि ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी ठिकठिकाणी बारवा आणि विहिरींचे जाळे विणले होते, त्यातीलच ही एक महत्त्वाची वास्तू आहे. या विहिरीचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण अशा दगडी चिऱ्यांमध्ये केलेले असून आजही ते अत्यंत भक्कम स्थितीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हा होळकरकालीन इतिहासाचा साक्षीदार आहे. खुडूस आणि आसपासच्या परिसरातील ही विहीर स्थानिक लोकांसाठी श्रद्धेचे आणि अभिमानाचे स्थान आहे. अनेक दशकांनंतरही ही विहीर अस्तित्वात असून, ती परिसरातील ऐतिहासिक जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना मानली जाते.

























