आटपाडी – सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातील १ गुंठाही शेतजमीन राजेवाडी तलावाच्या पाण्याने अधिकृतरित्या भिजत नसेल तर राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सातारा जिल्ह्याकडे ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी केला जात आहे. असा सवाल, आटपाडीचे सामाजीक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी उपस्थित करून राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याचा मंत्री महोदयांचा आदेश धुडकावणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने तात्काळ बडतर्फ करावे . अशी मागणी केली आहे .
सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडी गावच्या हद्दीत मुख्य भराव्याची भिंत असलेला म्हसवड मध्यम प्रकल्प अर्थात राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग व्हावा . म्हणून गत वर्षापासून जोरदार आवाज उठविणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष, आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक, शासकीय पातळीवरून सुरु असलेल्या, राजेवाडी तलाव सातारा सिंचन मंडळ सातारा कडे वर्ग करण्याच्या हालचालीवरून खुप व्यतित झाले आहेत . वास्तवीक ११ जुन २०२५ रोजी सांगलीत झालेल्या जलसंपदा विभागाच्या बैठकीत राज्याचे जलसंपदा मंत्री ना . श्री . राधाकृष्ण विखे पाटील यांनी, राजेवाडी तलाव सांगली सिंचन मंडळाकडे वर्ग करण्याच्या सुचना – आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. गत ४ महिन्यात राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करायचे सोडाच . या आढावा बैठकीच्या इतिवृत्तात मंत्री महोदयांच्या या आदेशाची दखलही न घेता अधिकाऱ्यांनी संगनमताने या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे . हे अत्यंत दुर्देवी व अन्यायी असल्याकडे सादिक खाटीक यांनी लक्ष वेधले आहे .
राज्याचे मुख्यमंत्री ना . देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना . एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना . अजितदादा पवार साहेब, राज्याचे जलसंपदा मंत्री ना . राधाकृष्ण विखे – पाटील साहेब यांनी या प्रकाराची गंभीरपणे दखल घेऊन, मंत्री महोदयांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर बडतर्फीची कडक कारवाई करावी. अशी मागणीही सादिक खाटीक यांनी यावेळी केली आहे .
राजेवाडी तलावातून एकूण ४०४९ हेक्टर क्षेत्राला पाणी दिले जात असल्याचे आणि त्यापैकी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याला १३८७ हेक्टर क्षेत्राला आणि सोलापूर जिल्ह्यातील २६६२ हेक्टर क्षेत्राला, दोन वेगवेगळ्या कॅनॉल द्वारे पाणी दिले जाते. ही तलावाच्या निर्मितीपासून आज अखेरची स्थिती आहे . म्हसवड ते कटफळ पर्यत १६ किलोमीटरचा पहिला कॅनॉल आणि कटफळच्या पुढे २२ किलोमीटरचा दुसरा कॅनाल , अशा दोन कालव्याद्वारे राजेवाडी तलावाचे पाणी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील शेतजमिनीला दिले जाते . १८८० पासूनच्या या व्यवस्थेनुसार माण तालुक्यातील १ गुंठाही शेतजमिनीला राजेवाडी तलावाचे पाणी अधिकृतरित्या दिले जात नाही . ब्रिटीशकालीन राजेवाडी तलावातून पाणी उपसा करण्यासाठीची प्रारंभापासून तरतूदच नसल्याने राजेवाडी तलावाचे, माण तालुक्यातल्या पाणी मिळविण्याऱ्या हजारो शेतकऱ्यांनी आजअखेर पाणी उपसा परवाने घेतलेले नाहीत . आणि तलावाचे व्यवस्थापन फलटण, पंढरपूरच्या ज्या शासकीय व्यवस्थेकडे आहे . त्यांच्याकडूनही कोणालाही पाणी उपशाचे अधिकृत परवाने दिले गेलेले नाहीत . तलावाच्या प्रारंभीच्या आखणीत पाणी उपशा संदर्भाचा उल्लेख नसल्याने ही शासकीय व्यवस्था, पाणी उपशाचे रितसर परवाने देत नाही. आणि अनधिकृतपणे राजेवाडी तलावाच्या बॅकवॉटर क्षेत्रातले पाणी उपसा करणाऱ्या शेकडो पंपावर कायदेशीर कारवाईही केली जात नाही . राजेवाडी तलावाच्या बुडीत क्षेत्रालगतच्या बॅक वॉटर मधून किती विद्यूत मोटारी अनधिकृत पाणी उपसताहेत, त्यांची संख्या किती , एकूण किती पाणी उपसले जाते आहे .याचा रितसर सर्व्हे अपुऱ्या मनुष्य बळामुळे केला नसल्याचे अधिकारी सांगत असल्याचे बोलले जात आहे .

१८८० ते साधारणतः १९६० पर्यत पाणी उपशाची आधुनिक यंत्रणा अस्तित्वात नसल्याने राजेवाडी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातल्या माण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना केवळ परक्युलेशन मधून अर्थात झिरपलेल्या पाण्याचाच विहीरीवरील मोटातून उपयोग झाला असणार आहे . तथापि भारतात पाणी उपसणाऱ्या डिझेल इंजिनद्वारे आणि नंतरच्या पाणी उपसणाऱ्या विद्यूत मोटारीद्वारे उपसा केल्या जाणाऱ्या काळापासून आज अखेर पर्यत अर्थात साधारणत : ५० – ६० वर्षांपासून राजेवाडी तलावाचे पाणी माण तालुक्यातील, राजेवाडी तलावा लगतच्या शेकडो शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात उपसले असणार आहे . याची कोठेही नोंद नाही . सारे काही आलबेल सुरू आहे. गत ५० – ६० वर्षात माण तालुक्यातल्या राजेवाडी तलावाचे पाणी अनधिकृतपणे उपसणाऱ्या , वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी अप्रत्यक्षरित्या कोट्यावधीची पाणीपट्टी बुडवल्याचे यातून स्पष्ट होते. याची खंत, ना अधिकाऱ्यांना आहे . ना राज्यकर्त्याना आहे . वर्षानुवर्षाचा हा झाकरीत गोलमाल झाकण्यासाठी आणि पुढेही तो चालु ठेवण्यासाठीच राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सातारा जिल्ह्याकडेच ठेवण्याचा अधिकाऱ्यांचा आटापिटा सुरू नाही ना ? अशी शंका आपणास येते आहे .
कृष्णा नदीही महाबळेश्वर येथे अर्थात सातारा जिल्ह्यात उगम पावते. आणि समुद्राला मिळेपर्यत कृष्णेवर अनेक धरणे उभारली गेली आहेत . त्या सर्वांचे व्यवस्थापनही साताऱ्याकडेच घेतले पाहिजे का ?, वास्तवीक राजेवाडीतल्या म्हसवड तलावाचा मुख्य भरावा , पाण्याचा काही भाग आणि भराव्यापुढील कॅनॉलचा काही किलोमीटरचा भाग सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातला आहे . या तलावाचे रितसर लाभार्थी तालुके आटपाडी आणि सांगोला हे दोनच आहेत . माण तालुक्यात १ गुंठ्यालाही रितसर पाणी घेतले जात नाही . हे वास्तव आहे . सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉ . बाबासाहेब देशमुख, सांगोल्याचेच दोन माजी आमदार अनुक्रमे ॲड . शहाजीबापू पाटील आणि दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांना पाठविलेल्या खास पत्राद्वारे राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याची मागणी नोंदविली आहे . सांगली जिल्ह्यातून आमदार सुहास बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरभाऊ गाडगीळ, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजीत देशमुख, आमदार इद्रिस नायकवडी, या सत्ताधारी ७ आमदार महोदयांनी आणि खासदार विशालदादा पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार रोहीत आर आर आबा पाटील या विरोधी ३ खासदार – आमदार महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांना खास पत्रे लिहून राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे .
राज्यातले एकूण १४ विद्यमान आमदार, ६ विद्यमान खासदार , ६ माजी आमदार , ४ अन्य मान्यवर महोदय अशा एकूण ३० मान्यवर महोदयांनी राजेवाडी प्रश्नी मुख्यमंत्री महोदयांना पत्रे लिहीली आहेत .
राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग होऊ नये यासाठी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री ना . जयकुमार गोरे साहेब आग्रही असल्याचे बोलले जाते . ना . गोरे साहेब हे सर्वसामान्य कुटूंबातून पुढे आलेले नेतृत्व असून त्यांच्या राजकीय जीवनाची जडण घडण सांगली जिल्ह्यात झाली आहे . म्हैशाळ, टेंभू पाणी उपसा सिंचन योजनांमध्ये समावेश असणाऱ्या सांगोला, मंगळवेढा तालुक्यातल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सांगलीचे व्यवस्थापन चालते . मग राजेवाडी तलावाचे रितसर लाभार्थी नसलेल्या माण तालुक्याच्या अनुषंगाने राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन साताऱ्याकडेच ठेवण्यासाठीचा आटापिटा कशासाठी सुरू आहे. ३ टीएमसी क्षमतेचा राजेवाडी तलाव गाळाने २ टीएमसी पाणी क्षमतेचा झाला आहे . तलावाच्या एकूण पाणी साठ्यापैकी १० टक्के पाणी उपसा सिंचन साठी दिले जाते . असा नियम असल्याचे सांगीतले जाते . तथापि माण तालुक्यातील, राजेवाडी तलावाचे अनधिकृत पाणी उपसणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांनी, पाऊण टीएमसी ते एक टीएमसी इतके पाणी उपसण्याचे काम प्रति वर्षी केल्याचे सांगीतले जाते . या अनधिकृत उपशाची तातडीने सखोल चौकशी व्हावी . पाणी उपशासाठी वापरल्या गेलेल्या अनधिकृत विद्यूत मोटारींची तातडीने मोजदाद केली जावी . या अनधिकृत लाभार्थ्यांकडून आणि डोळेझाक केलेल्या अधिकाऱ्यांकडून गत ६० वर्षाची किती पाणी पट्टी अप्रत्यक्षरित्या बुडविली गेली याची आकडेवारी जाहीर व्हावी . राजेवाडी तलावाच्या व्यवस्थापन नियमात बदल करून, पाणी उपशाचे रितसर परवाने दिले जावेत . सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्याचा भाग राहीलेला आणि या तिन्ही जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आमचा आटपाडी तालुका आहे . माणदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाणही आटपाडी तालुका आहे . राजेवाडी तलावाचा मुख्य भरावाही सांगली जिल्ह्याच्या या आटपाडी तालुक्यात राजेवाडीत आहे . राजेवाडी तलावाचे रितसर लाभार्थी सांगोला, आटपाडी, या दोन्ही तालुक्यांची मागणीही राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगली जिल्ह्याकडे द्यावे अशी आहे . हे सर्व लक्षात घेऊन ना . गोरे साहेबांनी राजेवाडी तलाव सांगलीकडे वर्ग करण्यास विरोध करू नये . आज अखेर माण तालुक्यातील राजेवाडी तलावाच्या अनधिकृत पाणी लाभार्थी शेतकऱ्यांविषयी सांगोला आणि आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ब्र ही काढलेला नाही . आणि भविष्यातही ते काढणार नाहीत . हे लक्षात घेऊन गोरे साहेबांनी राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याच्या प्रक्रियेला पाठीबांच द्यावा अशी विनंती, मी प्रसार माध्यमातून त्यांना करीत आहे .
राजेवाडी तलावाच्या मुख्य भराव्यापासून म्हसवड हे शहर २५ किमी इतके दूर आहे . हे लक्षात घेऊन तलावाचे नाव म्हसवड मध्यम प्रकल्प ऐवजी राजेवाडी तलाव असे शासनस्तरावर करावे व हा तलाव सांगली जिल्ह्याकडे तातडीने वर्ग करावा . याचे उपविभागीय कार्यालय आटपाडी येथे तर शाखा कार्यालये महुद आणि राजेवाडी सुरू करावीत . राजेवाडी तलावाच्या बुडीत क्षेत्राच्या बॅक वॉटरचे, आवश्यक असणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी उपसाचे रितसर परवाने देवूनच पाणी दिले जावे . राजेवाडी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातून केली जाणारी प्रचंड प्रमाणातील्या वाळू तस्करीवर कठोर पावले उचलावीत . सांगोला आणि आटपाडी तालुक्यातील युवक मित्र, मैत्रीणी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, लाभार्थी शेतकरी, वडील मंडळी, बंधु भगिनी या सर्वांनी राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग करण्याच्या माझ्या मागणीला जोरदार पाठींबा द्यावा . भविष्यात मी छेडण्याऱ्या या संदर्भातल्या आंदोलनात सर्वांनी प्रचंड संख्येने सहभाग नोंदवावा . सांगोला, आटपाडी तालुक्यातील जनतेने आणि आमदार डॉ . बाबासाहेब देशमुख, आमदार सुहास बाबर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सांगली, सोलापूर जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व पक्षाच्या आमदार, खासदार महोदयांनी राजेवाडी तलाव सांगली जिल्ह्याकडे वर्ग होण्यासाठी आणि मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवावा . असे आवाहनही सादिक खाटीक यांनी केले आहे

















