पंढरपूर – अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्या शिवाय रहात नाही. इडापिडा टळू दे-बळीचे राज्य येवू दे. अशी मागणी करीत ऊसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपये दर मिळालाच पाहिजे या मागणीसाठी वाखरी (ता.पंढरपूर) येथील पालखी तळावर गेल्या चार दिवसांपासून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आंदोलन करीत आहेत. जिल्ह्यातील साखरसम्राटांनी तसेच शासनाने हे आंदोलन गांभिर्याने घ्यावे यासाठी वाखरी येथे गुरुवारी (ता.११) रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले. या बरोबरच येथील सिताराम कारखान्यावरील ऊसाच्या गव्हाणीत देखील शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी उड्या घेऊन आंदोलन तीव्र केले.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेसह इतर सर्व शेतकरी संघटनेने एकत्रितपणे सोलापूर जिल्ह्यातील साखऱ् कारखान्यांनी उसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपये दर मिळावा यासाठी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन वाखरी येथे सुरु असलेल्या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या संदर्भात बेमुदत उपोषणास बसलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी समाधान फाटे यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्यांनी अद्याप ऊसाचा दर जाहीर केलेला नाही. राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकीक आहे. मात्र हाच जिल्हा उसदर घोषित करण्याबाबत अद्याप मागे आहे.
एकीकडे शेजारील सातारा जिल्ह्यातील कारखान्यांना आपल्याच जिल्ह्यातील काही भागातून उस पुरवठा होत आहे. या उसाला ३ हजार ५०० रुपयांचा दर भेट आहे. विशेष म्हणजे या कारखान्यांना ऊस नेत असताना लांबची वाहतूक आहे. मग आपल्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना तेवढाच उसदर देण्यासाठी काहीच अडचण असण्याचे कारण नाही असा सवाल देखील उपोषणकर्ते समाधान फाटे हे उपस्थित करीत आहेत. परवा दिवशी समाधान फाटे यांची प्रकृति देखील बिघडली होती. मात्र तरी देखील ते उपोषणावर ठाम आहेत.
दरम्यान उस आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच गुरुवारी (ता.११) येथील आंदोलनकर्ते तसेच शेतकऱ्यांनी वाखरी येथे रास्तारोको आंदोलन केले. यावेळी सातारा तसेच पुणेकडे जाणारी वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. या बरोबरच शेतकरी संघटनेच्या दीपक भोसले, सचिन पाटील तसेच शेतकरी नेते दीपक पवार यांनी सिताराम कारखान्यावर देखील आंदोलन छेडले. यावेळी या मंडळींसह शेतकऱ्यांनी उसाच्या गव्हाणीत उड्या घेत आंदोलन केले.
यावेळी पोलिस आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या मध्ये काहीकाळ तुतु मैमै झाले. मात्र तरी देखील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
दरम्यान येत्या एक, दोन दिवसांमध्ये उस दराची ही कोंडी फोडली नाहीतर सोलापूर जिल्ह्यातील एक देखील कारखाना सुरु ठेवला जाणार नाही असा इशारा देखील यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे साखरसम्राटांकडून किंवा शासनाकडून येथील उसदराची कोंडी फोडण्यासाठी काय भूमिका घेतली जाते याकडे आता सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरीबांधवांचे लक्ष लागले आहे.
——————-
ज्या तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले त्याच जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी वाखरी येथील पालखीतळावर ज्या ठिकाणी विसावते त्याच पालखीतळाच्या पायथ्याशी आम्ही बेमुदत आमरण उपोषण करीत आहोत. त्यामुळे ऊसदराची कोंडी फोडण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील साखरसम्राटांना सुबुध्दी देवो हीच श्री विठ्ठलरुक्मिणी आणि जगतगुरु संत तुकोबारायांच्या चरणी आमची प्रार्थना आहे.
समाधान फाटे ( उपोषणकर्ते )
















