चाळीसगांव :- लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्या याचा राग डोक्यात ठेवून पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत: रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना चाळीसगाव शहरात घडली. पत्नी दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. आईवडीलांच्या मृत्यूने दोन्ही चिमुकल्या मुलींचे मातृ व पितृ छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरज दिलीप कुऱ्हाडे (वय-28) असे आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे तर रेश्मा सुरज कुऱ्हाडे असे मयत पत्नीचे नाव आहे.
धुळे जिल्ह्यातील जुनोने येथील रेश्मा सोबत तीन वर्षांपुर्वी सूरज याचा विवाह झाला होता. तो पत्नी आणि मुलाबाळांसह चाळीसगाव शहरातील करगाव रोडवरील जय गणेश नगर वास्तव्याला होता. मातीकाम करून आपला उदरनिर्वाह करत होता. लग्नानंतर सूरजला पहिली मुलगी झाली. मात्र त्याला मुलाची इच्छा होती. सूरला दारूचे व्यसन देखील होते. या दोन्ही कारणावरून त्याचे पत्नी रेश्मा हिच्यासोबत नेहमीच भांडण व्हायचे. गेल्या चार महिन्यांपुर्वीच रेश्मा दुसऱ्या बाळंपणासाठी माहेरी जुनोने येथे गेली होती. तिला दुसरीही मुलगीच झाली. तिथं दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सूरज रेश्माला घेवून चाळीसगावला परतला.
दरम्यान, चाळीसगावात घरी परतल्यावर दोन दिवस उलटले. सकाळी 7 वाजेच्या सुमारास दोन मुलीच झाल्या यावरून त्याचा पत्नी रेश्मासोबत वाद झाला. या वादात त्याने रेश्माच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. घटनेनंतर सूरज घरातून निघून गेला. घराजवळ गर्दी जमली असतानाच काही वेळातच सूरजने तो राहत असलेल्या परिसरातीलच धुळे रेल्वे लाईनवर रेल्वखाली झोकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.
रेश्माच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून खात्री केली असता मयत हा सूरज हाच असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मयत रेश्मा हिचे नातेवाईक प्रताप शांताराम गायकवाड रा. जुनोने ता.जि.धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पत्नीची हत्या आणि नंतर पतीनं केलेल्या आत्महत्या या घटनेने चाळीसगाव शहर हादरले आहे. तर दुसरीकडे दोन चिमुकल्यांचे मातृपितृ छत्र हरपल्याने सर्वत्र या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक बिरारी करीत आहे.