पंढरपूर – येथील यमाई तलाव लगतची जागा गोशाळेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस देण्याचा निर्णय शासनाने रद्द न केल्यास यमाई तलाव बचाव समितीच्या वतीने १ जुलै २०२६ रोजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार येथील पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून करण्यात आला.
शहरातील यमाई तलावालगतची सुमारे ३.१२ हेक्टर जागा श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीस गोशाळा विस्तारासाठी देण्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रस्ताव शासनाकडे सादर करावा म्हणून सांगितले होते. यावेळी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांनी ही जागा गोशाळेसाठी देऊ नये म्हणून जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन व प्रांत अधिकारी सचिन इथापे यांना निवेदन दिले होते. पंढरपूर शहरातील नागरिकांचा विरोध असून सुद्धा पुन्हा शासनाने मंदिर समितीस गोशाळेसाठी जागा देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पंढरपूरकरांमध्ये अतिशय तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पंढरपूर शहरातील अनेक पर्यावरण प्रेमी संघटना,राजकीय,सामजिक संघटनेच्या प्रमुख यांनी एकत्रित येत आपलं सर्वांचं शासनाच्या निर्णयाचे विरोधात यमाई तलाव येथे बुधवारी (ता.२४) बैठकीचे नियोजन केले होते
पंढरपूर नगरपरिषदेच्या निधीतून यमाई तलावाची देखभाल पूर्वी पासूनच केली जाते. तसेच राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत माजी उपमुख्यमंत्री स्व.आदरणीय अजित दादा पवार आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे विशेष प्रयत्नातून या तलावाचे सुशोभीकरण करून पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक, तुळशीवृंदावन, तसेच पक्षी निरीक्षणासाठी वॉच टॉवर उभारण्यात आले असून हजारो महिला पुरुष नागरिक दररोज येथे व्यायाम व विरंगुळ्यासाठी येतात.
या तलावावर देशी-विदेशी पक्षी तसेच औषधी वनस्पतीची झाडे,फळांची व जुनी झाडे ही आहेत.मंदिर समितीकडे वाखरी, गोपाळपूर, अनवली व पंढरपूर तालुक्यात इतरही मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. त्या जमिनीवर गोशाळा उभारणे अधिक योग्य व संयुक्तिक ठरणार आहे
शासनाने भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या परिसरात पिकनिक स्पॉट, पर्यटन केंद्र,बोटिंग,सायकल ट्रॅक, ओपन जिम, ऑक्सिजन पार्क व इतर सार्वजनिक सुविधा उभारण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. कारण पंढरपूर शहरा मध्ये एकमेव ही यमाई तलावाची जागा शिल्लक राहिली आहे
वरील सर्व बाबींचा विचार करता, यमाई तलावालगतची जागा गोशाळेसाठी देणे शहराच्या विकासाच्या व नागरिकांच्या हिताविरुद्ध आहे. त्यामुळे शासनाने दिलेली मंजुरी तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा सरकारच्या या निर्णयाविरोधात पंढरपूर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, राजकीय, सामाजिक संस्था व पर्यावरण प्रेमी संस्था, शहरातील नागरिक यमाई तलावच्या बचावासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक १ जुलै २०२६ रोजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती नगरसेवक ॲड सुनिल वाळूजकर यांनी दिली
यावेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, गट नेते भागवत बडवे ,नगरसेवक ॲड सुनिल वाळूजकर,अमोल डोके, धर्मराज घोडके, राजू सर्वगोड, माजी नगरसेवक किरण घाडगे,ॲड.गुरुदास अभ्यंकर, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, सुप्रभात ग्रुप मंगेश गांगवे, वृक्ष प्रेमी ग्रुप चे सोमनाथ होरणे, सौदागर मोळक, आर पी आय नेते संतोष पवार, सुहास शिर्के, भाग्यश्री लिहिणे यांनी तीव्र निषेध नोंदवला. यावेळी सामजिक कार्यकर्ते अशोक शिंदे, विवेक परदेशी ,माजी नगरसेवक सचिन कुलकर्णी योग साधक वृक्षप्रेमी सदस्य व पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 14