बार्शी – अक्कलकोट येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभात रस्ते वाहतूक व महामार्ग खात्याचे केंद्रीयमंत्री ना. नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना टेंभुर्णी-कुईवाडी-बार्शी लातूर या महत्त्वाच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. यावेळी माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी डीपीआरला मान्यता देऊन प्रशासकीय मंजुरी तातडीने द्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली.
सोलापूर, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांना जोडणारा टेंभुर्णी- कुडूवाडी- बार्शी- लातूर मार्ग हा व्यापारी, औद्योगिक आणि कृषी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर वाढती वाहतूक, अपघातांचे प्रमाण आणि खराब अवस्थेत वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण ही परिसरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी बनली होती.
मा. आ. राजाभाऊ राऊत यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर या रस्त्याचे महत्त्व विशद करताना सांगितले की, हा मार्ग विकसित झाल्यास औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल, कृषी उत्पादनांच्या वाहतुकीला गती मिळेल तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क अधिक मजबूत होईल. याशिवाय वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटण्यासही मोठी मदत होणार आहे.
या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला. तसेच प्रत्यक्ष कामालाही गती देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला नवे बळ मिळणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यक्रमावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, मा. आ. रामभाऊ सातपुते, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, शहाजी पवार तसेच सोलापूर शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

























