सोलापूर – स्वच्छता, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता व लोकसहभाग महत्त्वाचा असून यामुळे गावात स्वच्छता व आरोग्य संपन्नता नांदते. नरोटेवाडी गावाने स्वच्छता व समृद्ध गाव अभियानात केलेले काम प्रशंसनीय असल्याचे विभागीय आयुक्त प्रांजल शिंदे यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणल्या, ग्रामीण भागात विकासात्मक दिशा देण्यासाठी शासनाचे विभागनिहाय अनेक विकासात्मक योजना असून स्वच्छतेसाठी स्पर्धात्मक अभियान राबवले जात आहे. मात्र त्या गावपातळीवर चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. नरोटेवाडी ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात व समृद्ध गाव अभियानात केलेले काम निश्चित कौतुकास्पद आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी व करमाळा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायतीची विभागस्तरीय तपासणी केली. यावेळी त्या नागरिकांसमवेत बोलत होत्या.
यावेळी सहा. आयुक्त रवींद्र कणसे, सहाय्यक प्रशासन अधिकारी शैलेश सराफ, विभागीय आयुक्त विशाल भुरकुंडे, कनिष्ठ सहा.आयुक्त अविनाश लोखंडे, गटविकास अधिकारी राजाराम बोंग, महादेव शिंदे, विस्तार अधिकारी सोमनाथ शिंदे, सरपंच उमेश भगत, उपसरपंच महेंद्र खटके, ग्रामसेविका सुवर्णा घोडके उपस्थित होते.
यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, गावातील रस्ते, घरकुलांची पाहणी केली. यावेळी भीमाशंकर उंबरे, अर्जुन दुर्लेकर, ज्ञानेश्वर आतकरे, बचत गटाचे सदस्य, अंगणवाडी आशा सेविका, नागरिक उपस्थित होते.