खेड तालुक्यातील चाकण-आंबेठाण मार्गावर खराबवाडी गावच्या हद्दीत टाकण्यात येणाऱ्या व जाळल्या जाणाऱ्या कचऱ्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. या ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रे लावण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे खेड पंचायत समितीला व पोलिसांत पत्रे देऊन बेकायदेशीरपणे कचरा टाकणाऱ्या काही लोकांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी दिली.
खराबवाडी-वाघजाईनगर येथील दगडी खाणीत चाकण व परिसरातील काही ग्रामपंचायतीचा कचरा टाकण्यात येतो. तसेच, काही व्यक्ती पिंपरी चिंचवड परिसरातील घातक कचरा येथे टाकतात. याबाबत पोलिसात तक्रार केल्याचे नितीन गोरे यांनी सांगितले.दरम्यान, चाकण नगरपरिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने दगडी खाणीतील कचऱ्याची व परिसराची संयुक्त पाहणी केली. यावेळी नितीन गोरे, भाजपचे उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.