विरोधीपक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या बैठकीमध्ये इंडियाच्या चिन्हाचे अनावरण होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. यासंदर्भात राऊत यांनी सांगितले की, इंडिया आघाडीचं चिन्ह हे सर्वांसाठी प्रेरणादायी असणार आहे. तसेच या चिन्हाचे 31 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजता ग्रँड हयात हॉटेलमध्ये अनावरण होणार आहे. त्यामुळे आता आमच्यावर घाव घालणे किंवा आरोप करणे सगळ्यांनाच महागात पडणार आहे.
विरोधी पक्षांची मुंबईत जी बैठक पार पडणार त्याचं आयोजन शिवसेना (ठाकरे गट) कडून करण्यात येणार आहे. इंडिया आघाडीच्या चिन्हामध्ये इंडियाची खास झलक सर्वांना पाहायला मिळणार आहे. या चिन्हामध्ये सर्वांना बांधून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आहेत. याशिवाय पूर्वेकडील काही राज्यांमधील पक्ष देखील या आघाडीमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. याशिवाय एनडीमधील काही पक्ष इंडिया आघाडीमध्ये सामील होणार असल्याचा दावा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसेचे नेते अलोक शर्मा म्हणाले की, एनडीच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले काही पक्ष काहीच दिवसांमध्ये विरोधी पक्षांच्या गटामध्ये सामील होणार आहेत. तसेच येणाऱ्या कालावधीमध्ये विरोधी पक्षांकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात येणार आहेत. मुंबईत 1 सप्टेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक पार पडणार आहे. यासाठी मुंबईत जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आली आहे.