भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे निधन झाले. वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इस्रोच्या महत्वाकांक्षी चांद्रयान 3 सह अनेक मोहिमांच्या उड्डाणांच्या काऊंटडाऊनला वलरमथी यांचा आवाज लाभला होता. हाच आवाज आता अवकाशात विसावला आहे.
इस्रोचे माजी संचालक डॉ. पीव्ही वेंकीटाकृष्णन यांनी ट्वीटरवर त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, श्रीहरिकोटा येथून इस्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या काऊंटडाऊनसाठी वलरमथी मॅडमचा आवाज येणार नाही. चांद्रयान 3 ही त्यांची अंतिम काऊंटडाऊन घोषणा होती. अनपेक्षित निधन. खूप वाईट वाटते. प्रणाम!
चांद्रयान ३ अवकाशात झेपावले, त्यावेळी झालेल्या काऊंटडाऊनला वलरमथी यांचा आवाज लाभला होता. दरम्यान शनिवारी रात्री त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने तामिळनाडूतील अरियालुर येथे निधन झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
कोण होत्या एन. वलरमथी?
वलरमथी यांचा जन्म ३१ जुलै १९५९ रोजी झाला आणि १९८४ मध्ये त्या इस्रोमध्ये रुजू झाल्या. त्यांनी अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला आणि RISAT-1 या पहिल्या स्वदेशी-विकसित रडार इमेजिंग उपग्रह (RIS) आणि भारताचा प्रकल्प संचालक म्हणून काम केले. १५ ऑगस्ट २०१५ रोजी त्यांना प्रतिष्ठित अब्दुल कलाम पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. मूळ चेन्नईमध्ये जन्मलेल्या वलरमथी यांना लहानपणापासूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड होती. वलरमथी यांच्या अचूक काऊंटडाऊन आणि त्यांच्या कार्याप्रती इस्रोमध्ये त्यांची एक वेगळी ओळख बनली होती.