खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेतून धडा घेऊन दीड लाख लोक येणाऱ्या कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ४ वाजता ठेवण्यात आली होती.
नवी मुंबईत शुक्रवारी ‘नमो महिला सशक्तीकरण अभियान’ सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागांतून आलेल्या महिलांना कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी पायपीट करावी लागली. विमानतळाच्या भव्य पटांगणावर आयोजित केलेल्या कार्यक्रमांत प्रचंड खर्च करण्यात आलेला असला, तरी महिलांचीही मोठी गैरसोयही झाली.
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेतून धडा घेऊन दीड लाख लोक येणाऱ्या कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ४ वाजता ठेवण्यात आली होती. नाशिक, ठाणे, पालघर, सांगली, सातारा, पुणे, रायगड आदी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून पहाटे लवकर निघालेल्या महिलांना गैरसोईचा सामना करावा लागला.
राज्य सरकारच्या एसटी बसमधून कार्यक्रमाला आम्हाला दुपारचे जेवणाचे नियोजन व्यवस्थित नसल्याचे जव्हार येथून आलेल्या कल्पना वातास यांनी सांगितले. जेवणाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही आमच्या घरून आलेल्या डब्यात जेवण घेऊन चालू बसमध्येच जेवण केले. अनेक महिलांना हा त्रास झाला.
नवी मुंबई विमानतळाच्या जागेवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुमारे अडीच हजार एसटी बस आणि इतर खासगी वाहनांची सोय सभा मंडपापासून दीड ते दोन किमी दूर केली होती. बसमधून उतरून डोक्यावर रुमाल बांधून दुपारच्या वेळेला महिलांचे जत्थेच्या जत्थे एकावेळी चालत होते. पाच वाजले तरी कार्यक्रमाकडे निघालेल्या लोकांची गर्दी कमी होत नव्हती.
साधा चहासुद्धा नाही
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मंडपाच्या दारात चहा बिस्किटाची सोय होती. परंतु, कार्यक्रम संपल्यानंतर महिलांना चहाचीदेखील व्यवस्था नव्हती. पाण्याची सुविधा प्रचंड होती, परंतु नाश्ता आणि पाणी मिळाले नसल्याची तक्रार शिरूर तालुक्यातून आलेल्या ललिता कुंभार यांनी सांगितले. आम्हाला घरी पोहचण्यासाठी आता मध्यरात्र होईल, अशी चिंता यावेळी महिला व्यक्त करीत होत्या.
कार्यक्रमाला येणारे लोक टप्प्याटप्याने आले, परंतु पंतप्रधानांचे भाषण संपताच पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालेल्या नागरिकांनी एकाच वेळी गर्दी केल्यामुळे उलवेकडील रस्ता काही वेळ बंद करावा लागला. त्यामुळे वाहतुकीवर ताण आला. रात्री पावणे नऊ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झाली नव्हती, अशी माहिती वाहतूक व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी दिली.
दुपारच्या उन्हाचा त्रास
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या नवी मुंबईत नेमके आज ३५ अंशापेक्षा ऊन होते. त्यामुळे काही नागरिकांना याचा त्रास झाला. उन्हाच्या त्रासामुळे ११५ जणांना मंडपाजवळ उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नऊ रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल केले होते; तर एका रुग्णाला एमजीएम कामोठे येथे उपचारासाठी रवाना केले. परंतु कोणालाही गंभीर त्रास झाला नसल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यात महिला सशक्तीकरण अभियानाला सुरुवात करण्यात आली. यानिमित्त महिलांसाठी ‘नारी शक्ती दूत’ या अॅपचे अनावरण करण्यात आले. राज्य सरकारतर्फे महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना, विविध घोषणा आणि उपक्रमांची माहिती या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवण्याचा महिला व बालविकास विभागाचा मानस असल्याचे सांगण्यात आले.
या अॅपच्या माध्यमातून कोणत्या योजना लागू होतील, याबाबतची माहिती गरजू महिलांपर्यंत पोहोचवली जाईल, असे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. राज्य सरकारतर्फे महिलांसाठी दरवर्षी विविध योजना आणि प्रकल्प राबविण्यात येतात. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. या विविध योजना नेमक्या काय आहेत, त्याची पात्रता काय, यांसारख्या अनेक प्रश्नांमुळे बऱ्याच योजना महिलांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर तटकरे यांच्या सूचनेनुसार ‘नारी शक्ती दूत’ अॅप तयार करण्यात आले आहे.
या अॅपद्वारे राज्यातील महिलांना त्यांच्या संदर्भातील विविध योजनांची माहिती नोटिफिकेशन आणि इतर माध्यमातून पुरविण्यात येणार आहे. त्याशिवाय योजनांच्या विविध बातम्याही यावर उपलब्ध असतील. महिला व बालविकास विभागाच्याच नव्हेत, तर सरकारच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या महिलांसाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचे तटकरे यांनी नमूद केले. अॅपमध्ये या विविध योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधाही पुरविण्यात येणार आहे. अॅप आणि वेबपोर्टलसाठी विशेष डॅशबोर्ड तयार करण्यात आला असून, अँड्रॉइडआधारित मोबाइलवरच सध्या ही सुविधा असल्याचे सांगण्यात आले.