मराठा आरक्षण विषयक मागण्यांसाठी आग्रही असलेले मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तब्येत उपोषणाला साथ देत नाही, मी असेल-नसेल माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, लेकरांच्या अंगावर गुलाल उधळला गेला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाची एकजूट तूटू देऊ नका!
त्यासोबतच त्यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांना काही सूचना केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, मराठा समाजाची एकजूट तूटू देऊ नका, सात महिने आम्ही सरकारला वेळ दिला, मात्र आरक्षण मिळालं नाही. आता ही आरक्षणाची शेवटची लढाई आहे. शेवटची लढाई आरपारची आहे. कोणी कोणाची वाट पाहू नका, मुंबईत मराठ्यांचा कोटींचा आकडा दिसेल. आंदोलन शांततेतच होईल, पायी मोर्चा शांततेतच काढा, उद्रेक करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. अंतरवालीमधूनच आमरण उपोषण करत मुंबईकडे जाण्याचा विचार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांच्या मुलांचे सरकारला देणे-घेणे नाही!
जरांगे पाटील म्हणाले, हे सरकार निर्दयी आहे. मराठ्यांच्या मुलांचे यांना देणे-घेणे नाही. आतापर्यंत आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे तब्बल सात महिन्यांचा अवधी सरकारला दिला. मात्र, सरकार अजूनही कोणताच निर्णय घेत नाही. आतापर्यंत तब्बल ५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत. पण त्यांना अद्यापही प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे आम्हाला बैठकीसाठी बोलावले असतांना आम्ही का बैठकीत सामील व्हायचं, असा प्रश्नही त्यांनी केला.
अन्यायाचा कळस
पाटील म्हणाले, आम्ही मराठा आरक्षणासाठी तब्बल 45 वर्षांपासून लढत आहोत. आतापर्यंत 250 जणांनी आरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. मात्र, सरकार अजूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गांभीर्याने घेताना दिसत नाही. हे सरकार एवढे निर्दयी कसे असू शकते? ज्या मराठ्यांनी सरकारला सत्तेत बसवले तेच सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही? हे भयानक आहे. आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. आमच्यावर लाठ्या चालवल्या तरी सुद्धा आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. आता मुंबईला जाण्याची घोषणा करून देखील सरकार आरक्षणाचा मुद्दा हा गांभीर्याने घेत नाही हा आमच्यावरील अन्यायाचा कळस आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं, तर मुंबईकडे जाण्याची वेळ आली नसती. मुंबईत काहीही झालं तरी हरकत नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी 24 डिसेंबरपर्यंतची वेळ दिली होती. मात्र आरक्षण न मिळाल्याने त्यांनी 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी 20 तारखेपासून मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.