मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनासाठीची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. आंदोलन करावं इतकी आझाद मैदानाची क्षमता नाही. त्याऐवजी जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशल कॉर्पोरेशन पार्क मैदान येथे आंदोलन करावे, असा पर्याय मुंबई पोलिसांनी नोटीसीद्वारे दिला आहे.
काय म्हटलंय नोटिसीत
मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. तसेच मराठा आंदोलनामुळे विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल. आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही, त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील, असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहेत.
ज्याअर्थी, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई येथे विविध वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय वकालती व इतर वित्तीय केंद्रे कार्यरत आहेत. मुंबईत अंदाजे दररोज ६० ते ६५ लाख नागरिक हे नोकरी निमित्ताने ट्रेन व इतर वाहतुकीच्या माध्यमाने प्रवास करत असतात. सकल मराठा समाज आंदोलक हे प्रचंड मोठ्या वाहन संख्येसह मुंबईत आल्यास त्याचा विपरीत परिणाम होईल आणि मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे ७००० स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता ५००० ते ६००० आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे. परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही व त्या प्रमाणात सोयी सुविधा देखील तेथे नाहीत. तसेच उर्वरित मैदान क्रीडा विभागाच्या अखत्यारित असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक मैदान ३०२४/प्र.क. १२/२०२४/कीयुसे-१, दि. २४.०१.२०२४ अन्वये तेथे आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशल कॉर्पोरेशन पार्क मैदान येथे आंदोलन करावं, अशी सूचना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी भेटायला यावं – जरांगे पाटील
दरम्यान जरांगे पाटील यांनी म्हटले की, मुंबईकर, आमचे हाल होऊ नयेत असं वाटत असेल तर सरकारनं तोडगा काढावा. आम्ही पण ऊन, वाऱ्यात आहोत, आमचेपणं हाल सुरु आहेत. सरकारचं शिष्टमंडळ नाही, काही अधिकारी भेटायला आले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेटायला यावं. तेच तेच मुद्दे सांगितले जात आहेत. आम्हाला विजयाचा गुलाल उधळायचा आहे. आझाद मैदानात तयारी झाली आहे. स्टेज तयार झालं आहे. आम्हाला सरकारला सहकार्य करायचं आहे. त्यामुळेच आम्ही लोणावळ्यात थांबलो आहोत. काही मंत्री आणि सचिव चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळ जिथे म्हणेल, तिथं चर्चा करू. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा. मुंबईला आम्हाला येण्याची हौस नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.
आज बंद दाराआड चर्चा केली नाही. काहीही अफवा पसरवू नका. अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. माहिती देण्यासाठी ते आले होते. माझ्या समाजाला काही अडचण नाही मग तुम्हाला काय अडचण आहे. आमच्या बांधवांनी आझाद मैदानाची परवानगी मिळाल्याचं सांगितलं आहे. नोटीस मी वाचली नाही. पण, परवानगी मिळाल्याचं मला सांगण्यात आलंय. आम्ही आझाद मैदानाला जाणार आहोत, असेही ते म्हणाले.




















