याबाबत आपल्या सोशल मिडीय पोस्टवर पंतप्रधान म्हणाले की, मला हे सांगताना अत्यंत आनंद होतोय की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला असून या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचे भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. संघटनेच्या तळापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारत देशाची सेवा करण्याचे काम केले. केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी संसदेत उपस्थित केलेले मुद्दे, त्यांची भाषणे आमच्यासाठी दिशादर्शक आणि समृद्ध असा अनुभव देणारी ठरल्याचे मोदी यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. लालकृष्ण अडवाणी यांना यापूर्वी 2015 मध्ये ना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर 9 वर्षांनी अडवाणी यांना सर्वोच नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून लालकृष्ण आडवाणी सक्रिय राजकारणातून अलिप्त आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात प्रचंड मोठी चळवळ उभारली. बाबरी मशीदीच्या विवादित जागेवर राम मंदिर व्हावे म्हणून त्यांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे जानेवारीमध्ये अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आडवाणी पुन्हा एकदा चर्चेत आले होते. सुरुवातीला चम्पत राय यांनी अडवाणींचे वय पाहता त्यांनी अयोध्येला येऊ नये असे म्हंटले होते. परंतु, त्यावर बरीच टीका झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कृष्ण गोपाल, राम लाल आणि विहिंपचे आलोक कुमार यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. परंतु, कडाक्याच्या थंडीमुळे अडवाणी अयोध्येला जाऊ शकले नव्हते.