मुंबई, 15 जुलै (हिं.स.)।
मध्य रेल्वेने सर्व पॅन्ट्री कार कर्मचाऱ्यांना सर्व गाड्यांमधील स्वच्छता प्रोटोकॉलचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कडक चेतावणी जारी केली आहे.
मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सनाही स्वच्छतेचे नियम आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा संदेश देण्यात आला आहे.
दि. ११.७.२०२४ रोजी अवध आसाम एक्स्प्रेसमधील नुकत्याच झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हे करण्यात आले आहे.
दि. ११ जुलै रोजी अवध आसाम एक्स्प्रेसच्या पेंट्री कारमधून कचऱ्याची बेजबाबदारपणे विल्हेवाट लावल्याबद्दल एका जागरूक नागरिकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओ तक्रारीला प्रतिसाद म्हणून, तिनसुकिया विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांनी त्वरीत निर्णायक कारवाई केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर, तिनसुकिया विभागाचे डीआरएम, भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) सोबत तात्काळ समन्वय साधून यातील संबधित परवानाधारकावर १५,००० रुपयांचा महत्त्वपूर्ण दंड वसूल करण्यात आला. याव्यतिरिक्त, सर्व गाड्यांवर स्वच्छता प्रोटोकॉलचे सक्त पालन सुनिश्चित करण्यासाठी कडक चेतावणी जारी केली गेली. शिवाय, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) सहकार्याने केलेल्या प्रयत्नात, या गैरवर्तनासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी जलद कारवाई करण्यात आली. पॅन्ट्री कार कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आणि भविष्यात अशा वर्तनास प्रतिबंध करण्यासाठी रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय रेल्वे सर्व गाड्यांमध्ये स्वच्छता आणि परिचालन शिस्त यांचे सर्वोच्च मानक राखण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्वांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित प्रवासी वातावरण सुनिश्चित करण्याच्या भारतीय रेल्वेच्या समर्पणाची पुष्टी करून, प्रवाशांना आणि भागधारकांना अशा कोणत्याही घटनांची त्वरित निवारणासाठी तक्रार करणे सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केले जाते.
स्वच्छतेची खात्री करण्याच्या या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे तसेच स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास अथवा अशा कोणत्याही घटना घडल्यास त्यांची तक्रार तात्काळ नोंदवावी, असे आवाहन मध्य रेल्वेने करीत आहे.



















