तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : वरळीतील नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी झालेल्या गोंधळानंतर विधान परिषदेचे सदस्य सुनील शिंदे यांचे पुत्र आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सिद्धेश शिंदे याने आपल्याला धक्काबुक्की केली, असा आरोप शिंदे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात दादर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार ही महिला शाखाप्रमुख असून सध्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहे.
नारळी पौर्णिमेनिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ. आदित्य ठाकरे एकाचवेळी वरळीतील कोळीवाड्यात गेले. यावेळी दोन्हीकडचे शिवसैनिक आमनेसामने आले. त्यांनी एकमेकांविरुद्ध घोषणबाजी सुरु केल्याने गोंधळ उडाला. त्यांना थोपविताना पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती.
पोलिसांनी मध्यस्थी करत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांना जाण्यासाठी मार्ग करुन दिला. या पाच मिनिटाच्या काळात कार्यकर्ते आक्रमक झाले. एकनाथ शिंदे परतीच्या मार्गानं गेले तर आदित्य ठाकरे समुद्राच्या बाजूने पुढे गेले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. अरुंद गल्लीतून दोन्ही नेते पास होत असताना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली.
आ.सुनील शिंदे यांचे पुत्र सिद्धेशने केलेल्या मारहाणबाबत संबंधित महिला शाखाप्रमुख म्हणाल्या की, “ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आम्ही खाली येत होतो. त्यावेळी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आमच्या विरोधात गद्दार अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर गर्दीमध्ये माझ्या पाठीत एकाने ठोसा मारला. मी मागे पहिले असता त्यावेळी तो सिद्धेश शिंदे होता. त्याने नंतर मला एक पंच मारला, त्यांचा शिंदेसाहेबांवर हल्ला करायचा प्रयत्न होता.
गद्दाराचा रडीचा डाव: आदित्य ठाकरे
सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात तक्रारीबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, हा शिंदेंचा रडीचा डाव आहे. राजकीय सत्तेचा वापर करत आपल्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आमचा हा बालेकिल्ला आहे. वरळीत नेहमी येणेजाणे असते. केवळ मिरविण्यासाठी फेऱ्या मारत नाही, असा टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
Post Views: 50