मंगळवेढा – कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याच्या 2025-2026 या बाराव्या गळीत हंगामाचे बॉयलर पूजन व अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार दि.14/10/2025 रोजी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाले.
प्रारंभी कारखान्याचे सिनिअर इन्स्ट्रुमेंट इंजिनियर श्री. कदम यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा व युनिट हेड श्री. तुकाराम देवकते यांचे हस्ते अग्निप्रदीपन करण्यात आले.
यावेळी बोलताना चेअरमन श्री उमेश परिचारक म्हणाले की, आपल्या कारखान्याचा हा बारावा गळीत हंगाम असून मागील अकरा हंगामात युटोपियनने भरीव कामगिरी केली आहे. चालू गळीत हंगामात 6.00 लाख मे.टन ऊसाचे गाळप करून ऊसाच्या रसापासुन व बी हेवी मोलॅसेस पासून 1.50 कोटी लिटर इथेनॉल उत्पादित करणार असलेचा मानस आहे. शासनाने दिनांक 01 नोव्हेंबर, 2025 पासुन गाळप परवाना दिलेला आहे त्यामुळे चांगल्या रिकव्हरीचा ऊस मिळेल. पहिल्या दिवसापासुन कारखाना पुर्ण क्षमतेने चालवला जाईल. चालू गळीत हंगामात ऊसाची उपलब्धता चांगली असून गत अकराही हंगामात ऊस उत्पादक हे युटोपियन कारखान्यास ऊस देण्यास प्राधान्य देतात व यापुढे हे देतील अशी खात्री आहे.
या गळीत हंगामात कारखान्याचे मार्गदर्शक आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या सुचने नुसार पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व मोहोळ या तालुक्यातील कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी यांचा संपूर्ण ऊस गाळप केला जाईल. त्यामुळे ऊस उत्पादकांनी चिंता न करता कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन ही परिचारक यांनी केले. कारखान्याने या वर्षी 10 हार्वेस्टर मशिन घेतलेल्या आहेत तसेच 250 ट्रॅक्टर, 150 मिनी ट्रॅक्टर याप्रमाणे करार केले आहेत.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक म्हणाले की, संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना यंत्रणा सज्ज आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना कर्मचारी यांना दिवाळी सणासाठी प्रती किलो 25/- रु. प्रमाणे साखर वाटप करणेत येईल. सर्व कामगार वर्ग हा चालू गळीत हंगाम यशस्वी करतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. सर्व कामगारांची दिवाळी गोड जाणेसाठी कामगारांना दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 8.33 टक्के बोनस दिला जाईल. या कार्यक्रमासाठी कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख व कामगार मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ई.डी.पी मॅनेजर अभिजीत यादव यांनी मानले.