‘हिंद पुनरुत्थान संघ’ या संस्थेतर्फे ‘कलियुग का समाधान – गीताका ज्ञान’ या विषयावर संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आर्य रवी देव जी यांचे प्रबोधन व्याख्यान, विद्यार्थी सहाय्यक समिती, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, पुणे येथे दिनांक ३१ जानेवारी सायंकाळी संपन्न झाले. पुणे स्थित राष्ट्र प्रेमी नागरिक बंधू -भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर होते. गुगल मीट अंतर्गत हे व्याख्यान घरी बसून ऐकण्याचा लाभही अनेक रसिकांनी घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक(निवृत्त) तसेच अभ्यांगतात एअर मार्शल प्रदीप बापट(निवृत्त) व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ भारतमाता पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला. संस्थेचे मुकुंद पुराणिक यांनी अभ्यागतांचे स्वागत केले तर निवृत्त ग्रुप कॅप्टन महाबळेश्वर देशपांडे यांनी संस्थेचा परिचय करून दिला.
श्री रवी देव जी यांनी भगवद् गीतेतील दाखले देत योगेश्वर श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रातील महत्वाच्या घटनांचे व विविध पैलूंचे दर्शन घडवले, तसेच सद्य आव्हानात्मक परिस्थितीशी सांगड घालीत, या गुण वैशिष्ठ्यांचे महत्व विशद केले.
वक्ते रवि देव यांनी,वाल्मिकी रामायण व तुलसीदास रचित रामचरितमानस हे रामायणाचे प्रमाण ग्रंथ आहेत,असे निक्षून सांगीतले. ‘यदा यदा ही धर्मस्य्’ व ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन’ या श्रीकृष्ण वचनांचा मतितार्थ विस्तृत करीत,हि शिकवण आजही कशी उपयुक्त आहे,याचे उचित मार्गदर्शन केले.
महाभारतातील कर्तव्य निष्ठांचा यज्ञ आजही सृष्टीत चालू आहे, हे सोदाहरण पटवून देत व्यक्तिगत धर्म व राष्ट्र धर्म याची गफलत पितामह भीष्म, द्रोणाचार्य आदी महारथींकडून घडली आणि भारत वर्षाला महाभारत संग्रामाला सामोरे जायला लागले, अशा धड्यातूनच कलियुगात समाधान मिळेल, असे कथन केले.
अर्जुनाने उपस्थित केलेल्या वर्ण-संकर शंकेचे समाधान वर्ण- सन्मानात आहे, हे पटवून देतांना आपल्या विहित कर्म-उद्दिष्टपूर्तिंची जाणीव त्यांनी श्रोत्यांना करून दिली.
गीतेतील श्रीकृष्ण नीतीचे योग्य मूल्यमापन,छत्रपती शिवाजी महाराज व विद्यमान राज्यकर्ते यांनी आपल्या कारभारात केल्याचे दिसते याचेही स्मरण उपस्थितांना करुन दिले.
आचार्य रविद्वजींनी आपल्या मधुर व रसाळ हिंदी वाणीने सभागृहाला मंत्रमोहित केले. महेश आचार्य यांनी आभार व्यक्त केले. वंदे मातरम् या राष्ट्र स्फूर्तिगानाने कार्यक्रमाची सांगता झाली.



















