पंढरपूर – राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या National Geographic India Photography Contest – “#CaptureInMotion” या स्पर्धेत टॉप तीन विजेत्यांमध्ये स्थान मिळविल्याबद्दल छायाचित्रकार राहुल गोडसे यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते गौरव व सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेसाठी राहुल गोडसे यांनी हुलजंती (ता. मंगळवेढा) येथे भरलेल्या यात्रेतील छायाचित्रांचा समावेश सादर केला होता. यात्रेतील भाविकांचे भावविश्व, श्रद्धा, लोकजीवन, हालचाल आणि क्षणांचे जिवंत दर्शन त्यांच्या छायाचित्रांतून प्रभावीपणे उलगडले असून, त्या छायाचित्रांनी परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. National Geographic India सारख्या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्थेने त्यांच्या छायाचित्रण कलेची दखल घेत Nat Geo India कडून सन्मानचिन्ह, स्टोरी बॉक्स तसेच विजेत्यांचे छायाचित्र पुस्तक प्रदान केले आहे. हा सन्मान केवळ एका छायाचित्रापुरता मर्यादित नसून, त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा, कलात्मक दृष्टीकोनाचा आणि छायाचित्रण प्रवासाचा गौरव असल्याचे यावेळी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी नमूद केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, राहुल गोडसे हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे छायाचित्रकार म्हणून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. मंदिर समितीच्या माध्यमातून त्यांच्या कलेला मिळालेल्या व्यासपीठामुळे त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्याचा गौरव कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी व्यक्त केला. आतापर्यंत गोडसे यांना नामवंत संस्थांकडून सुमारे १० ते १२ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यापूर्वी सन २०२३ मध्ये मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या छायाचित्राचा “मन की बात” या कार्यक्रमात विशेष उल्लेख केला होता. तसेच महाराष्ट्र शासनाकडून त्यांना यापूर्वी दोन वेळा गौरविण्यात आले आहे.
या सन्मानप्रसंगी सल्लागार परिषद सदस्य ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक संदेश भोसले, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, राजेंद्र सुभेदार, संजय कोकिळ, राजेश पिटले आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी गोडसे यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांचे हे यश परिसरातील तसेच राज्यातील नवोदित छायाचित्रकारांसाठी प्रेरणादायी ठरत असून, भविष्यातही त्यांच्या लेन्समधून समाजातील वास्तव, श्रद्धा व संवेदना प्रभावीपणे जगासमोर येतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
























