सोलापूर – महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात ‘अनुभव मंटप’ स्थापन करून लोकशाही विचारांची प्रभावी पायाभरणी केली. “काय कवे कैलास” या ब्रीदवाक्यानुसार त्यांनी समता, बंधुता आणि मानवमूल्यांचा पुरस्कार केला. जातीभेद नष्ट करून समानतेची शिकवण देणारे महात्मा बसवेश्वरांचे विचार आजच्या समाजासाठीही तितकेच प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कन्नड विभाग, भाषा व वाङ्मय संकुल आणि महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यातील कायक-दासोह’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अभ्यासक डॉ. बी. बी. पुजारी, डॉ. भीमाशंकर बिराजदार, डॉ. राजशेखर विजापुरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, भाषा व वाङ्मय संकुलाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. चंद्रकांत गार्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. अंजना लावंड यांनी स्वागत केले. महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. चंद्रकांत गार्डी यांनी कार्यशाळेची भूमिका मांडत प्रास्ताविक केले.
प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी आपल्या भाषणात महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यातील सामाजिक, धार्मिक व नैतिक मूल्यांचे सखोल विश्लेषण केले. कायक (श्रम) आणि दासोह (सेवा) या संकल्पनांमधून त्यांनी श्रमप्रतिष्ठा, सामाजिक न्याय व मानवी समतेचा संदेश दिला असून, तो संदेश आजच्या काळात अंगीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत डॉ. बी. बी. पुजारी, डॉ. भीमाशंकर बिराजदार व डॉ. राजशेखर सोलापूरे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, वचन साहित्याचे तत्त्वज्ञान आणि त्याचे समकालीन सामाजिक संदर्भ यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित संशोधक, विद्यार्थी व अभ्यासकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास वित्त व लेखा अधिकारी सीए महादेव खराडे, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. प्रशांत पवार, डॉ. वीरभद्र दंडे, प्राचार्य गजानन धरणे, ॲड. मल्लिनाथ शहाबादे, चन्नवीर बंकुर, राहुल पावले, महादेव न्हावकर, डॉ. राजीवकुमार मेंटे, डॉ. शिवानंद तडवळ यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ममता बोल्ली व श्रुती देवळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. गीता डिग्गे यांनी केले.
























