देगलूर – तालुक्यातील कुशावाडी येथे रस्त्याच्या उंचीकरणाने नागरिकांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले असून मागील काही महिन्यांपासून विद्युत तारा वारंवार तुटण्याचे सत्र सुरू आहे. होट्टल फाटा ते होट्टल पुढे करडखेडकडे जाणारा रस्ता नव्याने बांधण्यात आल्याने रस्त्याची उंची वाढली; मात्र या रस्त्यावरून जाणाऱ्या महावितरणच्या विद्युत ताऱ्यांची उंची मात्र कमी झाली आहे. परिणामी उंच वाहनांचा स्पर्श होऊन या तारा वारंवार तुटत असल्याने मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे.
कुशावाडी गावात रस्त्याच्या एका बाजूस असलेल्या डीपीपासून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गावाकडे जाणाऱ्या विद्युत तारा थेट रस्त्यावरून जात आहेत. यामुळे उंची असलेली वाहने या तारांना स्पर्श करून त्या तुटून थेट रस्त्यावर कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून एखाद्या क्षणी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके आहेत. तुटलेल्या विद्युत तारांमुळे या स्मारकांना नुकसान पोहोचण्यासह नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
बातमीपुरते नव्हे, सामाजिक कर्तव्यही निभावले
दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास या मार्गाने जाणाऱ्या एका वाहनामुळे विद्युत तार तुटून ती थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाभोवती गुंडाळली गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, धोका किती गंभीर आहे हे या घटनेने अधोरेखित केले. या घटनेची माहिती मिळताच दै. तरुण भारतचे प्रतिनिधी मिलिंद वाघमारे यांनी सामाजिक बांधिलकी जपत महावितरण देगलूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. चाटे यांना प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती दिली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उंचीचे खांब उभारणे अत्यावश्यक असून विद्युत तारांच्या स्पार्कमुळे स्मारकांसह नागरिकांना धोका होऊ शकतो, हा परिसर वर्दळीचा व बसस्थानकाचा असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. यामुळे तरुण भारत केवळ बातमीपुरते न थांबता सामाजिक जबाबदारीही पार पाडते, अशी भावना नागरिकांसह महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता श्री. चाटे यांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले.
बसस्थानक, हॉटेल्स, दुकाने… धोका अधिक तीव्र
हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून येथे कुशावाडी गावाचे बसस्थानक आहे. शिवाय दोन हॉटेल्स, कृषी सेवा केंद्र, इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान असल्याने दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक व प्रवासी नेहमीच येथे थांबलेले असतात. अशा ठिकाणी वारंवार विद्युत तारा तुटणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ करण्यासारखे आहे.
उंच खांबाशिवाय दुसरा पर्याय नाही !
नव्याने झालेल्या रस्त्यामुळे विद्युत तारांची उंची कमी झाली असून त्यामुळेच हे प्रकार वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी योग्य उंचीचे नवीन विद्युत खांब उभारावेत किंवा तात्पुरता उपाय म्हणून सध्याच्या खांबांची उंची वाढवावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
याआधीही अनेकदा तार तुटल्या
ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अनेक वेळा या मार्गावर विद्युत तारा तुटल्या आहेत. विशेषतः रात्री-बेरात्री एखाद्या वाहनामुळे तार तुटल्यास प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत आहे.
तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी उपचार हवेत
घटना घडताच सुजाण नागरिकांनी महावितरण विभागाला माहिती दिली. त्यानंतर विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन तुटलेल्या तारांची दुरुस्ती केली. मात्र ही कारवाई केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरत असून कायमस्वरूपी उपाययोजना केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी योग्य उंचीचे विद्युत खांब बसवून या धोकादायक परिस्थितीचे कायमस्वरूपी ‘ऑपरेशन’ करणे हाच एकमेव मार्ग असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



















