सोलापूर : शहरातील वसंत विहार आणि बाळे परिसरातून जाणाऱ्या आदीला नाल्याच्या मुद्द्यावरून सोलापूर महानगरपालिका आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. नाल्याला अचानक नदीचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी नदी परिसरात महापालिका आयुक्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नदीला परिसरातील रेड लाईट आणि ब्ल्यू लाईनला येथील नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.
नागरिकांच्या मते, सोलापूर महानगरपालिकेने यापूर्वी या प्रवाहाची नोंद नाला म्हणून केली होती. त्याच आधारे परिसरातील अनेक नागरिकांना बांधकाम परवाने देण्यात आले तसेच नियमितपणे मालमत्ता करही वसूल करण्यात आला. मात्र आता अचानक हा नाला नसून “आदीला नदी” असल्याचे सांगत महापालिकेकडून दोन्ही बाजूंना १०० मीटरची मर्यादा रेषा आखण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप करण्यात आहे.
नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की, जर हा प्रवाह सुरुवातीपासून नदी होता तर मग महापालिकेने आम्हाला बांधकाम परवाने का दिले? तसेच अनेक वर्षे आमच्याकडून कर वसूल का केला? महापालिकेच्या या निर्णयामुळे नाल्यालगत असलेल्या जवळपास ८०० गटांना कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम किंवा विकास परवाने देणे थांबविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता आणि नाराजी निर्माण झाली आहे. अनेक घरे व प्लॉट्स नो कन्स्ट्रक्शन झोन मध्ये येण्याची शक्यता आहे. बँक कर्ज घेऊन घर बांधलेल्या नागरिकांवर अर्थ आर्थिक संकट येऊ शकते. शहरातील सुमारे 800 गट या निर्णयामुळे प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
प्रत्यक्षात या नाल्याचे योग्य प्रकारे खोलीकरण आणि देखभाल करणे आवश्यक होते. ते न केल्यामुळे पावसाळ्यात पाणी परिसरात पसरत होते. मात्र त्या समस्येचे निराकरण करण्याऐवजी अचानक नाल्याला नदीचा दर्जा देऊन नागरिकांना बेघर करण्याचा डाव आखला जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला. या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेणार आणि नागरिकांना दिलासा मिळणार का, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.
आदीला पत्राचे खोलीकरण सुमारे पाच मीटर व रुंदीकरण 18 मीटर करावे. आदीला पात्राच्या दोन्ही बाजूला योग्य खोली उंचीची सिमेंट भिंत बांधावी. हिप्परगा तलावातील गाळ काढून साठवून क्षमता वाढवावी. रेड व ब्लू लाईन संदर्भातील सर्व तांत्रिक अहवाल व नकाशे सार्वजनिक करावेत. पूर्वी मंजूर बांधकामांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे. फायनल लेआउट मंजूर असलेल्या ठिकाणी बांधकाम परवाने सुरू करावेत. संपूर्ण शहरासाठी समग्र जल नियोजन आराखडा तयार करावा बांधकाम व वापर परवाना देण्यात यावा. ब्ल्यू लाईन व रेड लाईन हा विषयच रद्द करावा आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रविकिरण चव्हाण, प्रसाद गोडसे, रविकांत गेजगे, जयवंत सलगर , अनिल तेल्लू , धीरज नरोटे , सोमनाथ शिंदे, अंबादास सुरवसे, संतोष घोडके आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, महापौर विनायक कोंड्याल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी बाळे , वसंत विहार परिसरातील नागरिक प्रतिनिधी आले होते.


























