बार्शी – तालुक्यातील पानगांव येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या अष्टकोनी हत्ती तलावाने अनेक दशकांनंतर पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे. ग्रामस्थांच्या पुढाकारातून व विशेषतः तरुणांच्या श्रमदानातून राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे तलावाचे मूळ रुप पुन्हा उजागर झाले असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतिहासकालीन महत्त्व लाभलेल्या पानगाव गावाला स्वराज्याच्या परंपरेशी घट्ट नाते आहे. स्वराज्याचे पाचवे छत्रपती रामराजे महाराज हे इ.स. १७४५ ते १७५० या कालावधीत पानगाव येथे गुप्तपणे वास्तव्यास होते. येथूनच त्यांनी ४ जानेवारी १७५० रोजी सातारा येथे जाऊन छत्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यामुळे पानगावला ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तसेच छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराराणी यांच्या नात असलेल्या दर्याबाई साहेब नाईक-निंबाळकर यांचे सासरही पानगाव येथेच आहे. त्यांचे पती निंबाजीराव नाईक निंबाळकर हे स्वराज्याचे सरसेनापती होते. तत्कालीन अस्थिर राजकीय परिस्थितीत रामराजे महाराज यांच्या सुरक्षेसाठी त्यांना पानगाव येथे गुप्तपणे ठेवण्यात आल्याचे ऐतिहासिक दाखले उपलब्ध आहेत. याशिवाय अनेक नामांकित सरदार घराण्यांचा वावरही या गावात होता.
पानगावमध्ये आजही भव्य वेस, अष्टकोनी तलाव, ऐतिहासिक समाधी स्थळे आणि प्राचीन बारव यासारखी वास्तू अस्तित्वात आहेत. त्यापैकी सुमारे तीन एकर परिसरात पसरलेला अष्टकोनी हत्ती तलाव हा काळ्या बेसाल्ट दगडातून घडविण्यात आलेला एक अद्वितीय वारसा आहे. पूर्वी हत्तींना जलविहारासाठी या तलावाचा उपयोग केला जात असल्याचे सांगितले जाते.
मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाल्यामुळे तलाव परिसरात काटेरी झुडपे, वेली आणि गवत मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्यामुळे तलाव पूर्णतः झाकोळला गेला होता आणि त्याच्या दगडी बांधकामालाही धोका निर्माण झाला होता.
ही स्थिती लक्षात घेऊन गावातील २०० हून अधिक तरुणांनी एकत्र येत श्रमदानातून व्यापक स्वच्छता मोहीम राबवली. झाडे-झुडपे, वेली हटवून तलाव परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक दशकांनंतर प्रथमच तलावाचे मूळ सौंदर्य सर्वांसमोर आले असून त्याचे ऐतिहासिक वैभव पुन्हा खुलून दिसत आहे.



















