
सोलापूर – आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील गोपाळपूरमधील सोयरी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विकासकामे, पालखी मार्गावरील सुविधा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी प्रशासनावर सडकून टीका करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. या विशेष बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, गटनेत्या रश्मी बागल, मुख्यकार्यकारी अधिकारी कुशल जैन,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रशेखर जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासकीय अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुढे अण्णासाहेब ढाणे म्हणाले, “आम्ही सदस्य जनतेचे प्रश्न मांडतो, पण त्याची नोंदच होत नसेल तर सभा घेण्याचा उपयोग काय? आम्ही एक कप चहासाठी येथे येतो का? लोकांसमोर जाऊन काय सांगायचे?” असा सवाल करत ढाणे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवण्याची मागणी केली. “सभागृहाची चेष्टा करू नका, मनमानी कारभार थांबवा,” असेही ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्याला अनेक सदस्यांनी टाळ्या वाजवून समर्थन दिले.
यावेळी अण्णासाहेब ढाणे यांनी पदाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील कथित संगनमतावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “टेंडरबाबत बैठक घेतली जाते; मात्र टेंडर आधीच मंजूर झालेले असतात. मग आम्हाला विचारण्याचा अर्थ काय? आम्ही वेडे आहोत का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
आषाढी वारीसाठी उभारण्यात येणाऱ्या जर्मन हँगर मंडपांवरही त्यांनी टीका केली. “अगोदर पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्त करा, खड्डे बुजवा. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी जर्मन हँगर मंडप गळाले, काही ठिकाणी कोसळलेही होते. निधी आल्यानंतर विशेष सभा घेतली असती तर सदस्यांनी चांगल्या सूचना दिल्या असत्या,” असे त्यांनी सांगितले. स्वागत कमानी उभारण्याऐवजी वारकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
यावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी विविध मुद्द्यांवर खुलासा करताना निधी देण्यासंबंधी सकारात्मकता दर्शवली.
सभेत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव गटाचे व्यंकट भालके यांनी वारीच्या काळात काही खाजगी डॉक्टर पंढरपूर शहर सोडून जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. वारी कालावधीत डॉक्टरांनी शहरातच उपलब्ध राहावे, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवावे, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, महिला सदस्यांनीही रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. यामध्ये शन्मुखी कोरके, मयुरी बागल, गीतांजली साळुंखे, वंदना कांबळे यांच्यासह अन्य सदस्यांनी आषाढी वारीच्या अनुषंगाने ग्रामीण रस्ते आणि पाण्यासाठी वाढीव निधी देण्यासह मूलभूत सोई सुविधा देण्यासाठी विविध प्रश्न मांडले.
बोरामणी गटाचे सदस्य खंडागळे यांनी गोळेगाव येथे शेगावच्या गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी कायमस्वरूपी सुविधा उभारण्याची मागणी केली. या ठिकाणी सुमारे एक हजार भाविक येत असल्याने सभामंडपासाठी १५ लाख रुपये, रस्त्यासाठी १५ लाख रुपये आणि स्ट्रीट लाईटसाठी ५ लाख रुपये निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पालखी मार्गावरील गावांना वाढीव निधी देण्याची मागणीही त्यांनी केली. अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी माळीनगर परिसरातील उड्डाणपूल, रस्ते, गटारी आणि इतर प्रलंबित कामांचे प्रश्न उपस्थित केले.
आषाढी वारीच्या तयारीसाठी बोलावण्यात आलेली ही सभा विविध प्रश्नांवरून गाजली असून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत वारकऱ्यांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली.
चौकट
या विषयांना देण्यात आली मंजुरी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत जर्मन हँगर ८ कोटी, वॉटरप्रूफ मंडप ३.५ कोटी, औषध खरेदीसाठी १० कोटी, पाणीपुरवठ्यासाठी २ कोटी २८ लाख ,स्वागत कमानीसाठी ४ कोटी ४३ लाखाच्या कामांना या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
चौकट
समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी वारी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी “प्री वारी आणि पोस्ट वारी ही संकल्पना मांडली. वारीपूर्व काळात आवश्यक सुविधा, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, पाणीपुरवठा आणि रस्त्यांची तयारी यावर विशेष भर देण्यात यावा, तसेच वारीनंतर तात्काळ स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची पुनर्स्थापना आणि कामांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र नियोजन असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. सभेत पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, ग्रामपंचायतस्तरीय नियोजन, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन सेवा, रस्ते दुरुस्ती, निवास व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा यासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादर केली.
Post Views: 16