सोलापूर : केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूरसाठी मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसांच्या
आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, १५ ऑगस्टपर्यंत किमान १५ ते ३० ई-बस नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याच्या सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत पीएम ई-बस सेवा योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तळवळकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, नगरसेवक मनीष केत, जेबीएम कंपनीचे प्रतिनिधी कुलदीप गंगुरडे तसेच परिवहन विभागाचे अधिकारी नीलकंठ मठपती, अविनाश वाघमारे आणि अभिजित बिराजदार यावेळी उपस्थित होते.
सोलापूर शहरासाठी मंजूर झालेल्या १०० बसांमध्ये ९ मीटर लांबीच्या ७० आणि १२ मीटर लांबीच्या ३० बसांचा समावेश आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन या बसांना मंजुरी देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत टी.पी. क्रमांक २, न्यू बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे बांधकाम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले असून ‘बिहाइंड द मीटर’ (बीटीएम) वीज पायाभूत सुविधांची ९५ टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित कामे जुलैअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
लोकप्रतिनिधींनी शहरासह ग्रामीण भागात अधिक बससेवा उपलब्ध करून देणे, बसथांब्यांवर वेळापत्रक प्रदर्शित करणे, विद्यार्थी व महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करणे, तीर्थक्षेत्रांसाठी नवीन मार्ग विकसित करणे आणि ऑनलाइन तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मांडल्या.पीएम ई-बस सेवा योजनेमुळे सोलापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून प्रदूषणमुक्त, आधुनिक आणि नागरिकाभिमुख वाहतुकीच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
करार झाल्यानंतर चार्जिंग पॉइंट
कार्यान्वित करण्यात येणार
वाहनतळासाठी आवश्यक असलेली ३३ केव्ही वीजवाहिनी, ५००० केव्हीए क्षमतेची वीज यंत्रणा, चार्जिंग स्टेशन, कार्यशाळा, प्रशासकीय इमारत आणि वॉशिंग एरिया या सुविधांच्या उभारणीचीही माहिती देण्यात आली. उपकेंद्र व केबल टाकण्याची कामे पूर्ण झाली असून जेबीएम कंपनीसोबत करार झाल्यानंतर चार्जिंग पॉइंट कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
शासन नियुक्त जेबीएम कंपनी सर्व संचालन करणार
बैठकीत ई-बस संचालनासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या जेबीएम प्रा. लि., नवी दिल्ली या कंपनीसोबतच्या करारातील अटी-शर्तींवर चर्चा करण्यात आली. या करारानुसार बसचे संचालन, देखभाल-दुरुस्ती, चालकांची नियुक्ती, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि इतर खर्च कंपनीमार्फत करण्यात येणार आहेत.
सर्व कामे निर्धारित मुदतीत
पूर्ण करावीत : महापौर कोंड्याल
महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करून सोलापूरकरांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच स्वातंत्र्यदिनापर्यंत काही बस प्रत्यक्ष रस्त्यावर धावतील यासाठी संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.