
माढा : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सीना नदीला महापूर येऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुरात अनेक शेतकऱ्यांच्या पिकाबरोबर जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. अद्यापही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. काही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे, पण ती खूपच तोकडी आहे. तर काहींना 1 रुपयाचीही देखील मदत मिळाला नाही.
ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे, त्या शेतकऱ्यांना सरकारने साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. यामध्ये ४७ हजार थेट स्वरुपात तर तीन लाख रुपये मनरेगाच्या माध्यमातून देण्याचे जाहीर केले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. शासनाच्या अटी आणि शर्तीमुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली, त्यामध्ये खरवडून गेलेली जमीन नीट करणे शक्य नाही. कारण शेतात दहा दहा फुटाचे खड्डे पडलेत.
जमिनी खरवडून गेल्यामुळे नापीक बनल्या आहेत, अनेक ठिकाणी नदीची वाळू शेतात येऊन बसली आहे. त्यामुळे आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
काही शेतकऱ्यांनी सरकारी मदतीची वाट पाहून अखेरव्याजाने पैसे काढून जमिनी नीट करण्यास सुरुवात केली आहे.
महापुरामध्ये जमिनी वाहून गेल्यामुळे आमच्या मुलांची लग्न होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. आमची जमीन बघून आलेले लोक माघारी जात असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. यामुळे शेतकऱ्यांचं मानसिक आरोग्य देखील खचत चाललय.
सरकारने आमच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं नाहीतर आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
१) सप्टेंबर 2025 मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरात माझी साडेतीन एकर केळीची बाग आणि दोन एकर ऊस जमिनीसकट वाहून गेला होता. निर्यातक्षम केळी तयार झाली होती. विक्रीसाठी आलेली केळी महापुरानं उद्धस्थ केली. महापुरानं आमच्या तोंडचा घास हिरावल्याची भावना शंकर भरगवान लटके या शेतकऱ्याने व्यक्त केली. ज्यांच्या जमीनी खरवडून गेल्या त्यांना सरकारने साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, माझं एवढ नुकसान होऊनही सरकारची एक रुपयाची मदत देखील मला मिळालेली नाही. आता मी व्याजाने पैसे काढून माझी जमीन नीट करत आहे. सरकारच्या भरोशावर राहिलं तर खायचं काय? असा सवाल शंकर लटके यांनी केला.
….शंकर भगवान लटके, पूरग्रस्त शेतकरी केवड.
२) पूर येऊन नऊ महिने झाले. या महापुरात माझा दोन एकर उस जमिनीसकट वाहून गेला होता. एक टिपरु देखील जमिनीवर राहीलं नाही. मला सरकारची 1 रुपयाची मदत देखील मिळाली नाही. बँकेच माझ्यावर कर्ज आहे. ते कर्ज मी कसे भरायचे? असा सवाल शेतकरी जालिंदर बापू धर्मे यांनी केला आहे. आमच्यावर आत्महत्या करण्याचे वेळ आली आहे.
….जालिंदर बापू धर्मे, पूरग्रस्त शेतकरी केवड.
३) माझी पाच एकर जमीन होती. नऊ महिन्यापूर्वी सीना नदीला महापूर आला, त्यामध्ये सगळीच पाचच्या पाच एकर जमिनी वाहून गेली. या शेतात ऊस होता. ऊसासकट जमीन वाहून गेली. आता जमीन फक्त उताऱ्यावर राहिली आहे, प्रत्यक्षात शेतात काहीच नसल्याची माहिती दत्तात्रय धर्मे यांनी दिली. या नुकसानीचे मला फक्त 80 हजार रुपये मिळाले आहेत. या पैशात काहीच होणार नाही. त्यामुळं सरकारनं आम्हाला दुसरीकडे जमीन देऊन पूनर्वसन करावे. आमच्यावर आत्महत्या करण्याचे वेळ आली आहे.
….दत्तात्रय बापू धर्मे, पूरग्रस्त शेतकरी केवड.
Post Views: 26