पंढरपूर – पंढरपूरात महावितरणच्या लोड शेडिंगच्या विरोधात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तहसील कार्यालयावर आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन लंगोटे व महावितरणचे अधिकारी श्री.साळी यांनी उपस्थित राहून निवेदन स्वीकारले.
यावेळी बोलताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले की, पाऊस नसल्यामुळे एका बाजूने निसर्गाने शेतकऱ्यांवर घाला घातला आहे, तर दुसऱ्या बाजूला विजेअभावी शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे. ऊस, द्राक्षे, डाळिंब, केळीसह अनेक पिके आज शेतात उभी आहेत, पाणी वेळेवर मिळत नसल्याने पिकांची करपू लागली आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले. त्यातून शेतकरी त्यातूनच अजून सावरलेलाही नाही.
यामध्येच अधिकारी सांगतात की, संध्याकाळी ६ ते पहाटे ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मग उर्वरित १४ तासांमध्ये तरी योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना किमान सात तास नियमित वीजपुरवठा का केला जात नाही? नियमांच्या चौकटीबाहेर आमची कोणतीही मागणी नाही. पण नियमानुसार जेवढा वीजपुरवठा देणे अपेक्षित आहे, तो तरी सुरळीत आणि सातत्याने द्यायला पाहिजे हिच आमची प्रमुख मागणी असल्याचे सांगितले.
दरम्यान पुरासारख्या परिस्थितीत शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आज दुष्काळासारखी परिस्थिती असताना नदीतून पाणी उपसा करण्यासाठी केवळ दोन तास वीज देणे हा शेतकऱ्यांवरील अन्याय आहे. आज पिके उभी आहेत, आजच त्यांना पाण्याची गरज आहे. वेळ निघून गेल्यानंतर काहीच उपयोग होणार नाही.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व्यापार सेलचे अध्यक्ष नागेश फाटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, बाळासाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य संतोष बागल, भारत कोरके अमित साळुंखे, पंचायत समिती सदस्य शहाजी मुळे, सोमनाथ झांबरे, दीपक पवार, मनसेचे शशिकांत पाटील, अण्णा महाराज भुसनर. माऊली जवळेकर. दत्ताभाऊ बागल, निवास भोसले, तुकाराम मस्के, दिनकर चव्हाण, समाधान गाजरे, धनंजय गुळमे यासह अन्य मान्यवरांची भाषणे तहसील कार्यालयासमोर झाली.
——————
चौकट : ( अधिवेशनात विजेचा प्रश्न मांडणार )
येत्या २२ जूनपासून मुंबई होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विजेचा प्रश्न सातत्याने मांडणार असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
——————–
चौकट : ( सौर उर्जेचा पर्याय स्विकारावा )
यासोबतच शेतकऱ्यांनीही सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारण्यासाठी पुढाकार घ्यावा. सोलरसाठी अर्ज करावेत. अधिकाधिक सोलर प्रकल्प उभारल्यास डीपीवरील ताण कमी होण्यास मदत होण्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
Post Views: 9