सोलापूर : शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची कडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल २०२६ पर्यंत विभागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत १०७ खत विक्री परवाने निलंबित आणि ६ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत, तर ७ केंद्रांवर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली आहे.
या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात एकूण २ हजार ५७६ परवानाधारक केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान २८१ प्रकरणांमध्ये काळाबाजार झाल्याचे समोर आले असून, २७७ केंद्रांना ‘कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ६५० केंद्रांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७१ प्रकरणांत अनियमितता आढळली असून २७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात ८१२ केंद्रांची तपासणीनंतर १६ खत विक्री परवाने निलंबित आणि २ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले असून ३ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १ हजार १२९ केंद्रांची तपासणी करण्यात आली. १८ प्रकरणांमध्ये खतांचे नमुने निकृष्ट आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण ६४ परवाने निलंबित आणि ४ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले असून ४ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याशिवाय, अनुदानित युरियाचा औद्योगिक कारणांसाठी वापर टाळण्यासाठी विभागात ४२ औद्योगिक युनिट्सना भेटी देण्यात आल्या आहेत. कृषि विभागातर्फे खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्री. जेजुरकर यांनी दिला आहे. अधिकृत परवानाधारक कृषि केंद्रातूनच खत खरेदी करावे आणि काही तक्रार आल्यास नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
कारवाईच्या वेळी पुणे अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत, तंत्र अधिकारी निलेश गढरी, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अतुल जाधव आदी उपस्थित होते.
Post Views: 22