सोलापूर : महानगरपालिकेच्या 20 एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत 1400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा विषय अजेंड्यावर आला असून, भांडवली मूल्य आधारित कर प्रणालीच्या मुद्द्यावरून शहरात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन प्रशासनाला जाब विचारत आक्रमक भूमिका घेतली.
शुक्रवारी दुपारी महापौर विनायक कोंड्याल व सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पत्रकार परिषद घेत प्रकल्प मंजुरीनंतर कोणतीही करवाढ केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांमध्ये संभ्रम पसरू नये, यासाठी सत्ताधाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. त्यानंतर तासाभरात दोन्ही आमदार देशमुख यांनी आयुक्तांची भेट घेतली. अजेंड्यातील विषय इंग्रजीत का दिला, मराठीत का नाही, असा सवाल उपस्थित केला. स्थानिक भाषेचा सन्मान राखण्याची गरज विजय देशमुख यांनी व्यक्त केली. तसेच भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली लागू करू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.त्यावर आमदार देशमुख यांनी प्रत्येक वेळी चुका होतात. तुमच्या सोयीसाठी ते रिटायर झाले असतानाही कामावर ठेवले आहे, असे सांगितले.
आ. सुभाष देशमुख यांनीही या प्रकल्पातील 500 कोटींची वाढ कशी झाली, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला. दरम्यान, आयुक्त ओम्बासे यांनी अंतिम निर्णय सभागृहाचाच असल्याचे स्पष्ट केले. सत्ताधाऱ्यांकडून करवाढ नसल्याचे आश्वासन आणि त्याच पक्षातील आमदारांचा विरोध यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता 20 एप्रिलच्या सभेत नेमका काय निर्णय होतो, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.


























