सोलापूर – जिल्ह्यातील एकही बालक आरोग्य तपासणी, उपचार किंवा शस्त्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला अधिक गती दिली आहे. केवळ आरोग्य तपासणी करून थांबायचे नाही, तर तपासणीत आढळलेल्या प्रत्येक आजारावर वेळेत उपचार होऊन आवश्यक शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत आरोग्य, शिक्षण आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी विविध विभागांनी समन्वयाने काम करून प्रत्येक पात्र बालकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ५२ आरोग्य पथके कार्यरत असून, ही पथके अंगणवाडीतील ० ते ६ वर्षे तसेच शाळांमधील ७ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करत आहेत. तपासणीदरम्यान जन्मजात व्यंग, कुपोषण, शारीरिक व मानसिक विकासातील विलंब तसेच इतर गंभीर आजारांचे निदान करून संबंधित बालकांना तातडीने उपचारासाठी संदर्भित केले जात आहे.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अधीक्षक मयुर पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
चौकट
७२ हजार ७७ विद्यार्थ्यांची तपासणी
जून-जुलै २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार, अंगणवाडीतील २ लाख ६९ हजार ५१६ बालकांच्या उद्दिष्टापैकी १ लाख ९९ हजार ६४४ बालकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. तर एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत शाळांमधील ७२ हजार ७७ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.
चौकट
३९ बालकांना मिळणार नवे आयुष्य
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या ३९ बालकांची ओळख पटली असून, त्यांच्या ११ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शासनाच्या माध्यमातून हा संपूर्ण उपचार विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असल्याने या बालकांना नवजीवन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोट
आजाराचे वेळेत निदान, उपचार आणि आवश्यक
बालकांच्या आरोग्याची तपासणी ही केवळ औपचारिकता न राहता, प्रत्येक आजाराचे वेळेत निदान, उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा करावा. एकही बालक उपचारांपासून वंचित राहणार नाही, याची खात्री करणे हीच खरी जबाबदारी असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.
Post Views: 7