तुळजापूर व परिसरातील गावांत शुक्रवारी दर्शवेळ अमावस्येचा (यळवस) सण उत्साहात साजरा झाला. शेतकऱ्यांसह शहरी कुटुंबीयांनी ग्रामीण भागात जाऊन येळवशीच्या वनभोजनाचा आनंद लुटला. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर शहरांत शुकशुकाट दिसून आला.
दर्शवेळा अमावस्या (येळवस) हा ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण आहे. ग्रामीण भागात येळवशीला शेतकरी व शेतीशी निगडित सर्व कुटुंबीय शेतात जातात . मित्र व नातेवाइकांना भोजनासाठी आमंत्रित केले जाते. आज सकाळपासून शहरांतून ग्रामीण भागाकडे जाणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलले होते. त्यामुळे शहरांत दिवसभर शुकशुकाट होता. शेतकऱ्यांनी सकाळी कडब्याची खोप करून पाच पांडवांची पूजा तसेच सायंकाळी उत्तरपूजा केली जाते. त्यानंतर बालगोपाळांसह महिलांनीही येळवशीला भज्जी, बाजरीच्या भाकरी, आंबिल, बाजरीचे उंडे, खीर, धपाटे, तिळाची पोळी आदींसह रानमेव्याचा आस्वाद घेतला. ज्यांना शेती नाही अशांनी जवळ आसलेले मंदिरे व सार्वजनिक बागांमध्ये जाऊन वनभोजन केले. या दिवशी शासकीय सुटी असल्याने शेतशिवारात गर्दी दिसून आली.

















