चंबळ खोऱ्यातील डाकू पान सिंह तोमर आणि दहशतवादी गाजी बाबा यांना चकमकीत ठार करणारे दबंग आयपीएस अधिकारी विजय रमण यांचे पुण्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची कर्करोगासोबत झुंज सुरू होती. मात्र, ती अखेर अपयशी ठरली.
रमण हे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या १९७५ च्या तुकडीतील अधिकारी होते. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात पोलिस अधीक्षक असताना त्यांनी १९८१ मध्ये तोमर विरुद्ध १४ तास चाललेल्या चकमकीचे नेतृत्व केले होते. रमण यांचा अनेक दहशतवादविरोधी आणि नक्षलविरोधी अभियानात सहभाग होता.
रमण यांच्या पत्नी वीणा यांनी सांगितले की, रमण यांना फेब्रुवारीमध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाले होते आणि तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांच्यात सुधारणा झाल्याचे लक्षण दिसून आले होते. दरम्यान श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना १८ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना पुन्हा आयसीयूमध्ये हलवण्यात आले. गुरुवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली आणि कुटुंबीय त्यांना दोन-तीन दिवस घरी घेऊन जाणार होते, मात्र त्यांचे अचानक निधन झाले.
चंबळ परिसरात वास्तव्यास असलेल्या दरोडेखोर, डाकूंमध्ये रमण यांची दहशत होती. जेव्हा फुलन देवीने शरणागती पत्करली, तेव्हा तिने विजय रमणच्या जागी अन्य कोणाला तरी भिंडचा पोलीस अधीक्षक बनवण्याची मागणी केली होती. रमण यांनी मध्य प्रदेश पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि रेल्वे पोलीस दलात जबाबदारी सांभाळली होती.
संसद हल्ल्यातील मास्टरमाइंडचा केला होता एन्काउंटर
२००३ मध्ये विजय रमण हे श्रीनगरमध्ये सीमा सुरक्षा दलाचे आयजी म्हणून तैनात होते. त्यांनी १० तासांच्या आव्हानात्मक चकमकीचे नेतृत्व केले होते. यामध्ये संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी गाझी बाबा मारला गेला होता. त्याच वेळी, १९८१ मध्ये, ॲथलीट-डाकू पानसिंग तोमरचा एन्काउंटर देखील त्यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. पान सिंग तोमर विरुद्धची ही चकमक १४ तास चालली होती.