मंगळवार, 6 फेब्रुवारीची संध्याकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात कायम लक्षात राहील अशी… महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करत मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला. निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह दिलं, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला. या निकालाने एकच खळबळ माजली. हा निकाल शरद पवार गटासाठी मोठा झटका मानला जात असून त्यांच्या गटातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
याच निकालाच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे नेते, जितेंद्र आव्हाडांनी काही ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा’ असं लिहीत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
एवढंच नव्हे तर ‘ भीड में रहकर भी तनहा कौन है, ये तो झुठे से झुठा भी बतादेगा सच्चा कौन हैं | भेडीयों की भीड में शेर आने दो, पता चलेगा जंगल का राजा कौन है ‘ असं ट्विटही त्यांनी केलं. त्यापुढे त्यांनी शरद पवार यांचा हॅशटॅग वापरत त्यांच्याकडे अजूनही लढण्याची ताकद असल्याचे सूचित केले.