महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि कट्टर शिवसैनिक मनोहर जोशी यांचे शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) पहाटे ३ वाजताच्या सुमारास निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गुरुवारी रात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा सुरू होईल. दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. मे २०२३ मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.
मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. काल (शुक्रवारी) ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पूर्वायुष्य आणि राजकीय कारकीर्द
मनोहर जोशी हे मूळचे बीड जिल्ह्यातील होते. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळाली. पुढे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेचे काम सुरू केले. त्यामुळे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक आणि शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते होते. महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. बालपणी ध्येयाकडे खडतर सुरुवात सुसंस्कृत पण गरिब कुटुंबात जन्म झाल्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या तंत्रानं लहानपणापासूनच संघर्ष त्यांच्या नशिबी होता. वडिलांबरोबर भिक्षुकी करून पैसे मिळवत होते. सुरुवातीला माधुकरी, त्यानंतर मुंबईत येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, १९७६ ला मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर १९९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर १९९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला आहे. याशिवाय ते विधान परिषदेचे, राज्यसभेचे सदस्यही राहिले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रकृती खराब असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते. शिवसेनेत बंड झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती.