माहूर , दि. ०८ जुलै
शेतीपिकांचे नुकसानीचे अनुदान वितरण -प्रलंबित ई-केवायसी बाबत जिल्हा महसूल विभागाकडून वारंवार सूचना व आवाहन करण्यात येत असून,माहूर तालुक्यात गत दोनवर्षात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची शासनाकडून आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी आजपर्यंत तालुक्यातील २ हजार ५२८ शेतकऱ्यांची ई-केवायसी आजपर्यंत प्रलंबित आहे.या सर्वांनी आपापल्या सज्जाच्या तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून १० जुलै पर्यंत ई-केवायसी करून घ्यावी, त्या शिवाय शासनाकडून मंजूर करण्यात आलेली नुकसान भरपाई मदत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार नाही!”असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे.
माहूर तालुक्यात लागोपाठ दोन वर्षे अतिवृष्टी,गारपिट,नदी नाल्यांना आलेला पूर,वेळी अवेळी पडणारा अवकाळी
पाऊस यात शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे अतोनात नुकसान होऊन बळीराजा प्रचंड आर्थिक संकटात सापडला होता.नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल, पंचायत समिती व कृषी विभागाकडून तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या पिकांच्या पाहणी व पंचनाम्यानंतर दिलेल्या नुकसानीच्या अहवालानुसार शासनाने अनुदान घोषित केले होते.
तदनंतर अनुदान प्राप्तीसाठी महसूल विभागाकडून तहसीलदार किशोर यादव यांनी माहूर तालुक्यातील अतिवृष्टी, गारपीट, पूर, व अवकाळी पाऊस या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्या शेतातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन त्यावेळी केले होते. परंतु,माहूर तालुक्यातील एकूण ९३ महसुली गावांपैकी अनेक गावातील २ हजार ५२८ शेतकऱ्यांची ई-केवायसी सोमवार दि. ०८ जुलै पर्यंत प्रलंबित आहे.
ई-केवायसी करुन घेतली नसल्याने ते या अनुदानापासून वंचित असल्याचे ई-वंचित आहेत.आता यंदाचा पावसाळ्यातील खरीप हंगाम २०२४/२५ सुरू झाला असून,आश्चर्य म्हणजे गत दोन वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने ते या अनुदानापासून वंचित आहेत.व ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान रक्कम जमा झाली आहे, मात्र ज्या
शेतकऱ्यांची ई-केवायसी केली नाही त्यांच्या खात्यात रक्कम जमा होत नाही.
त्यासाठी विना विलंब येत्या १० जुलै पर्यंत ई-केवायसी प्रलंबित उर्वरित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करुन घेणे अनिवार्य असल्याने त्वरित ई-केवायसीई प्रलंबित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी! “असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.