*येरगी ग्राम पंचायत चे कार्य उल्लेखनीय – मीनल करनवाल*
#मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मेळावा सह विविध कार्यक्रम संपन्न#
देगलूर -: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी चे ग्राम पंचायत हे सर्वोत्कृष्ट होण्याच्या मार्गावर असून ग्रामपंचायतीचे कार्य उल्लेखनीय आहे.विविध क्षेत्रात येरगी ग्रामपंचायत अग्रेसर भूमिका घेत असून नांदेड जिल्ह्यात बालिका पंचायत राज चे कार्य सर्वात चांगले आहे त्याचा पुरस्कार ही त्यांना प्राप्त झाला आहे.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.
त्या देगलूर तालुक्यातील येरगी येथे काल गुरुवार दिनांक ११ जुलै रोजी बालीका पंचायत व ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी तहसीलदार राजाभाऊ देशमुख, संजय गांधी निराधार योजना चे अध्यक्ष संतोष पाटील,गट विकास अधिकारी शेखर देशमुख, नायब तहसीलदार संजय नागमवाड, तालुका आरोग्य अधिकारी रमेश गवाले,वैद्यकीय अधिकारी डॉ.योगिता चामले,बाल विकास प्रकल्प अधिकारी राजुरे, सरपंच सुनीता मठवाले, उपसरपंच मारोती तलारवार, विठ्ठाबाई बरसमवार, सुशिलाबाई सोमावार, कोंडाबाई वाघमारे, अशोक वाघमारे, विश्वनाथ बागेवार, बीट जमादार दीपक जोगे,पोस्ट कार्यालयाचे हणमंत जामनोर,पूजा जाधव,शिवप्रसाद देशमुख, गोरसुंदर कानोळे, तोसिफ शेख, वन विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.
ते म्हणाले की वृक्षारोपण ,दारूबंदी,शिक्षण,आरोग्य,बालिका आणि महिला सबलीकरणासाठी येरगी बालिका पंचायत व ग्राम पंचायत कडून विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत.जे आदर्शवत आहेत.
पुढे विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या की शैक्षणिक यशासह सामाजिक, सांस्कृतिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षक आणि पालकांनाही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचे आवाहन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांना मार्गदर्शन केले. तसेच या योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले.
बालीका पंचायत उपक्रमात येरगी ग्राम पंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी येरगी ला प्रथमच भेट दिली.त्यांनी ग्राम पंचायत आणि बालिका पंचायत राज समितीच्या वतीने गावात केलेल्या विकासाची नोंद घेत कौतुक केले.आणि जिल्ह्यातील इतरांनी या गावचा आदर्श घेतला पाहिजे असे सांगितले.तसेच संतोष पाटील यांच्यासारख्या युवक प्रत्येक गावात असेल तर त्या गावचा कायापालट नक्कीच होईल असे म्हणाले.
या कार्यक्रमात बालिका पंचायत व ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शाळा परिसरामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सुकन्या समृद्धी योजनेत संतोष पाटील यांच्या वतीने गावातील बालीकांचे खाते काढण्यात आलेले पासबुकचे वितरण करण्यात आले.
येरगी ग्रामपंचायतीने बालिका पंचायत उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन गावात सकारात्मक बदल करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच अनेक दिवसांपासून दर रविवारी गावात राबविण्यात येणाऱ्या सामूहिक स्वच्छता मोहिमेबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी ग्रामपंचायत, बालिका पंचायत तसेच गावकऱ्यांचे कौतुक केले. ही मोहीम पुढे सुरू ठेवून गावाचा कायापालट करुन इतर गावांना मार्गदर्शक ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहशिक्षक ईश्वर वाडीकर यांनी केले तर प्रभात फेरी व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालिका पंचायत राज समितीचे महादेवी दाणेवार, पुनम सुर्यवंशी, अंजली वाघमारे, करूणा बागेवार, शिवाणी मटपती, अनिता बागेवार, महादेव गादगे, रोहिणी दाणेवार, रूद्राणी चैडके, शिवकांता भुरळे, श्रीदेवी धाकपाडे, सर्व पदाधिकारी आणि शाळेतील शिक्षक आनंद कदम, राहुल ढगे, सिध्देश्वर कुंटे, भुमन्ना तलगे, रमाकांत वाघमारे हणमंत ठावरे आदींनी परिश्रम केले.
या कार्यक्रमाला सर्व बालिका पंचायत राज ,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,तंटामुक्त अध्यक्ष, पोलिस पाटील यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, शालेय विद्यार्थी व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.